LIVE UPDATES

आता रात्रीची ड्रायव्हिंग होणार अधिक 'सुरक्षित', सरकार वाहनांच्या हेडलाईटसाठी लागू करणार नवीन नियम

भारत सरकार वाहन नियमांमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 'केंद्रीय मोटार वाहन नियमां'मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार केला असून एप्रिल २०२७ पासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: August 24, 2026 17:46 PM
views 184  views
New vehicle light rules aimed at improving nighttime driving safety

नवी दिल्ली : रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी वाहन चालवताना सुरक्षितता वाढवण्यासाठी भारत सरकार वाहन नियमांमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 'केंद्रीय मोटार वाहन नियमां'मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार केला असून एप्रिल २०२७ पासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या नवीन नियमांनुसार, दुचाकींवरील 'ऑटोमॅटिक हेडलाइट्स' फक्त 'लो-बीम' मोडमध्येच कार्यरत राहतील. तसेच ट्रक आणि बसेससारख्या अवजड वाहनांना जेन्युइन 'रिफ्लेक्टिव्ह टेप्स' वापरणे अनिवार्य असेल. समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे चालकाचे डोळे ब्लॅंक होणे टाळणे आणि रस्त्यावरील एकूण सुरक्षितता सुधारणे हा या सरकारी उपक्रमाचा उद्देश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन दुचाकींमधील ऑटोमॅटिक हेडलाइट सिस्टीम 'लो-बीम' सेटिंगवरच फिक्स केली जाईल. हे नियम केवळ नवीन वाहनांनाच लागू होतील. रस्त्यावर आधीपासूनच धावणाऱ्या वाहनांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. अंधार आणि दाट धुक्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी बस आणि अवजड ट्रकसाठी उच्च दर्जाची आणि अस्सल 'रिफ्लेक्टिव्ह टेप' लावणे लवकरच अनिवार्य होऊ शकते.

तसेच, सरकार वाहनांच्या हेडलाइट्सचा ब्राइटनेस कमी करण्याची योजना आखत आहे. नवीन नियमांनुसार, दुचाकींच्या हेडलाइट्ससाठी कमाल ब्राइटनेसची मर्यादा १,५०,००० कँडेलावरून १,००,००० कँडेलापर्यंत कमी केली जाईल, तर चारचाकी वाहनांसाठी ही मर्यादा २,२५,००० कँडेलावरून १,५०,००० कँडेलापर्यंत कमी केली जाईल. तसेच, अतिशय पांढऱ्या आणि डोळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या प्रकाशाचा वापर रोखण्यासाठी कमाल 'कलर टेम्परेचर' ६,५०० केल्विन इतके प्रस्तावित करण्यात आले आहे. 

शहरात चालकांकडून विनाकारण 'हाय-बीम' हेडलाइट्स वापरण्याची सवय रोखण्यासाठी वाहनांमध्ये नवीन 'बीप' किंवा 'ऑडिबल अलर्ट' सिस्टिम आणण्याची योजनाही आखली जात आहे. दरम्यान, महामार्गावर ६० किमी/तास पेक्षा जास्त वेगाने वाहन चालवताना हा अलर्ट देणारा अवाज वाजणार नाही.