
देवगड : समुद्रात मोठ्या प्रमाणात वारे आणि उंच लाटांमुळे मासेमारी करणे अशक्य झाल्याने गुजरात राज्यातील तब्बल ६० पेक्षा अधिक मासेमारी नौकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आनंदवाडी (देवगड) बंदरात आश्रय घेतला आहे. या नौकांवरील खलाशांच्या आणि नौकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना तात्पुरता आश्रय दिला आहे.
समुद्रातील प्रतिकूल हवामानामुळे मासेमारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. जोरदार वाऱ्यांमुळे आणि लाटांमुळे खोल समुद्रात जाणे धोकादायक ठरले होते. त्यामुळे गुजरात येथील मासेमारी नौकांनी आपली आणि खलाशांची सुरक्षा लक्षात घेऊन देवगड बंदरात आश्रयासाठी विनंती केली होती. या विनंतीला प्राधान्य देत नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व ६० पेक्षा अधिक नौकांना देवगड बंदरात प्रवेश देण्यात आला, अशी माहिती देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी दिली.
देवगड बंदर हे कोकण किनारपट्टीवरील नैसर्गिक आणि सुरक्षित बंदरांपैकी एक मानले जाते. डोंगरांनी वेढलेल्या या बंदरात वादळी हवामानातही नौका सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे गुजरातसह इतर राज्यांतील मासेमारी नौका आपत्कालीन परिस्थितीत अनेकदा येथे आश्रय घेतात. यावेळीही प्रशासनाने मासेमारी समुदायाच्या हिताचा विचार करून सहकार्य केले.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अशा आपत्तीच्या वेळी नौका आणि खलाशांच्या जिवाची रक्षा करणे हे प्राथमिक कर्तव्य आहे. त्यानुसार बंदरात आलेल्या सर्व नौकांची मत्स्यव्यवसाय विभागाचे सागरी सुरक्षा रक्षक यांनी आवश्यक नोंदी व नौकेची कागदपत्रे तपासणी सुरू केली आहे. हवामान सुधारल्यानंतर या नौका आपापल्या ठिकाणी परत जाणार आहेत.
सध्या बंदरात या नौका सुरक्षितपणे दाखल झाल्या असून खलाशांना कोणतीही अडचण येणार नाही. या घटनेमुळे आंतरराज्यीय सहकार्याचे आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्थानिक प्रशासनाने गुजरातच्या मासेमारांना मदतीचा हात देऊन मानवीय दृष्टिकोन दाखवला आहे.












