
कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ या प्रसिद्ध धार्मिक स्थळ परिसरात सोमवारी पहाटे एका चार मजली हॉटेलला आग लागल्याची घटना घडली. तारापीठ पोलीस ठाण्यालगतच असलेल्या 'हॉटेल विदेशिनी' या चार मजली इमारतीच्या रिसेप्शन भागात अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत किमान 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ४:३० ते ५ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते आणि हॉटेलही पूर्णपणे भरलेले होते.
आगीची सुरुवात तळमजल्यावरील रिसेप्शन काउंटरपासून झाली. हॉटेल मालकाच्या दाव्यानुसार, एसी स्विचबोर्डमधील शॉर्ट सर्किट आणि एमसीबी मधील बिघाडामुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे. दुर्घटनेत रिसेप्शन भागातील फायबरचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंनी आग पकडल्यामुळे विषारी धूर चौथ्या मजल्यापर्यंत पसरला, त्यामुळे हॉटेलमध्ये झोपलेल्या भाविकांचा गुदमरून श्वास कोंडला गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. हॉटेलमधील जखमी भाविकांना तातडीने रामपूरहाट सरकारी वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले.














