निलेश राणे यांच्या वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी : विनायक राऊत

उद्धव ठाकरेंवर बोलणाऱ्या उदय सामंतांची लफडी बाहेर काढणार | उद्धव ठाकरे बारसुत ६ मे रोजी ग्रामस्थांना भेटणार
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 04, 2023 15:59 PM
views 136  views

कणकवली : बारसू येथे मोठा घातपात होण्याची शक्यता आहे, जिलेटिन येत आहेत,असे विधान निलेश राणे यांनी केले आहे. केवळ उद्धव ठाकरे ६ मे रोजी ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्यामुळे ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासाठी वक्तव्य आहे. त्यामुळे निलेश राणेंची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी. दोन्ही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी याबाबत गंभीर दखल घ्यावी, जे उदय सामंत आणि राणे विनाकारण काळ्या मांजरीप्रमाणे या दौऱ्याच्या आडवे येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची लफडी पुढील काळात बाहेर काढणार आहे. तसेच नारायण राणे आत्मचरित्रात लिहितात की, रिफायनरी हा प्रकल्प कोकणातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा असल्यामुळे माझा त्याला विरोध असणार आहे. मात्र आता सत्तेसाठी लाचारी झालेल्या राणे आणि त्यांची मुले रिफायनरी प्रकल्पाची दलाली करत असल्याचा घणाघाती आरोप खा. विनायक राऊत यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसुत ६ मे रोजी ग्रामस्थांना भेटणार आहेत.


कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.




बारसु परिसरातील ग्रामस्थ आणि आंदोलनकर्त्यांची वेदना ऐकण्यास उद्धव ठाकरे ६ मे रोजी येणार आहेत.सर्व गावातील हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ येणार आहेत. लोक मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांना भेटणार म्हणून भाजपाची काळी मांजरे जिलेटीन टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जिलेटीन स्फोटकांचा साठा आणि घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. निलेश राणे यांच्या कडे स्फोटकांचा माहिती असेल तर त्यांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी.आता त्या ठिकाणी स्थानिक जनता सायकल देखील नेऊ शकत नाही.निलेश राणे आणि भाजपचे लोक या रिफायनरी ची दलाली करीत आहेत. त्यादृष्टीने पोलीस अधीक्षकांनी याची दखल घ्यावी. पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष जावून स्थानिकांशी अद्याप संवाद साधन्याची हिमंत केलेली नाही.४३ लोकांवर तडीपारी केली आहे,असा आरोप खा.राऊत यांनी केला.


लोकांना नामोहरम करण्याचा सत्ताधारी लोकांकडून प्रयत्न केला जात आहे,त्या शिंदे सरकारचा निषेध करतो. उदय सामंत यांचा धिक्कार करतो.नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात रिफायनरी प्रकल्पाला विरोध राहणार आहे.६ हजार हेक्टर जमीन लागणार आहे.त्यामुळे आंबा आणि काजू बागा शेतकरी बाधित होणार असल्याने विरोध करणार असल्याचं म्हटल आहे.मात्र आता

राणेंनी सत्तेसाठी लाचारी त्यांची मुले काम करत आहेत.नितेश राणेंनी तर घंटानाद आंदोलन केले होते. त्यावेळी रिफायनरी प्रकल्प घातक असेल तर आता रिफायनरीचा कळवळा कसा? असा सवाल खा.विनायक राऊत यांनी केला आहे.


उदय सामंत उद्योग मंत्री झाल्यापासून कोट्यावधीचा भ्रष्टाचार करत आहेत. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये घपला केलेला आहे. रत्नागिरीत ६० कोटीचा त्यांच्याच कंपनीने केलेला रस्त्यावर आता १०० कोटीचा सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. मुळात पाच वर्ष देखभाल दुरुस्ती त्या कंपनीकडे असताना हा प्रस्ताव कशासाठी?आम्हाला धमक्या दिल्या आणि मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही गप्प बसणार नाही.राज्याचा उद्योग मंत्री ग्रामस्थांशी संवाद साधन्यासाठी गेले नाहीत.मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जमिनी आहेत,त्यांची चौकशी लावा. रिफायनरी होवो आणि न होवो लोकांचे डोक फोडायचे असा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.


जैतापूर प्रकल्पाला अशीच जमिनी खरेदी केल्या आणि आज एक इंचही अद्याप प्रगती नाही.रिफायनरी होण्याचा काडीमात्र संबंध नाही.मात्र ५ लाखाच्या जमीनीना १ कोटी  रुपयांची परतावा देऊन भूमाफिया लूट देण्याचे काम सरकार करण्याची शक्यता आहे. 


शिवसेना आ.वैभव नाईक म्हणाले,जैतापूर प्रकल्प येथून राणेंना हाकलून लावले, हे लोकांनी पाहिले आहे.उद्धव ठाकरे बारसु येथे येणार आहेत. कोण अडविण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना त्याच पदधतीने उत्तर देणार आहे. मोर्चा काढला तर शिवसेना तेव्हढ्याच ताकदीने उत्तर देईल, धमक्यांना आम्ही भीक घालत नाही.आम्ही गप्प बसणार नाही.रिफायनरीला आमचा विरोध कधीही नाही.आमचं म्हणणं आहे, लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्प करा.आम्ही लोकांसोबत आहे.उद्धव ठाकरे यांना कुणीही अडवू शकत नाही.