
सावंतवाडी : जागतिक युवा दिनाचे औचित्य साधत ‘कोकणसाद’च्या ‘युवा विश्व’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन उत्साहात करण्यात आले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ‘कोकणसाद’चे मुख्य संपादक सागर चव्हाण तसेच विविध महाविद्यालयांमधील युवा प्रतिनिधी उपस्थित होते.
सुरवातीला कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्याहस्ते नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच स्वागत करण्यात आलं. तसेच उपस्थित युवा प्रतिनिधी यांचं कोकणसादचे उपसंपादक लक्ष्मण आढाव, चीफ रिपोर्टर विनायक गांवस, आयटी हेड विद्देश धुरी यांच्याहस्ते स्वागत करण्यात आलं. कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी कोकणसाद्च्या 'युवा विश्व' पुरवणीबाबत तसेच या माध्यमातून युवा वर्गाला निर्माण होणाऱ्या व्यासपिठाबाबत सविस्तर माहिती सांगितली. युवा वर्गाच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या विचारांना आणि अपेक्षांना दिशा मिळावी, या उद्देशाने ‘युवा विश्व’ ही विशेष पुरवणी प्रकाशित करण्यात आल्याच त्यांनी सांगितलं.
प्रकाशन सोहळ्यानंतर नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांच्यासोबत युवा प्रतिनिधींचा मुक्तसंवाद आयोजित करण्यात आला. 'जेन झी' पिढीची आजच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीबाबत काय मते आहेत. त्यांना भविष्यातील कोकण कसा हवा याबाबात त्यांच्या मनात काय चाललंय यावर त्यांना बोलत करण्याचा या उपक्रमातून प्रयत्न केला. यावेळी उपस्थित तरुणांनी शिक्षण, रोजगार, शहरातील सुविधा, महिला सुरक्षितता, युवकांसाठीच्या उपक्रमांसह विविध विषयांवर नगराध्यक्षांना प्रश्न विचारले. या संवादात यशवंतराव भोसले इंस्टीट्यूटची विद्यार्थिनी पूजा सावंत, यशवंतराव भोसले इंस्टीट्यूटची अंजली सावंत, एसपीके महाविद्यालयाची श्रावणी सावंत, एसपीकेची पूर्वा गोसावी, आरपीडी महाविद्यालयाचा सुरज सावंत, कोमल परब, तनुश्का शिंदे, उपेंद्र रेडकर या विद्यार्थांनी या संवादात सक्रीय सहभाग घेत त्यांची मते खुलेपणाने मांडली.
तरुणांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना श्रद्धाराजे भोसले यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. युवकांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घेत त्यावर सकारात्मकपणे काम करण्याचे तसेच तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या मुक्तसंवादामुळे युवा प्रतिनिधींना थेट नगराध्यक्षांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ‘युवा विश्व’ पुरवणीच्या माध्यमातून कोकणातील तरुणांचे विचार, प्रश्न आणि अपेक्षा समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी कोकणसादचे उपसंपादक लक्षमण, चीफ रिपोर्टर विनायक गांवस, आयटी हेड विद्देश धुरी, मेगनाथ सारंग, प्रसाद कदम, साहिल दहिबावकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकणसाद LIVE ची मुख्य उपसंपादक जुईली पांगम हिने केलं.










