
मुंबई : राज्य अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील शिधापत्रिकाधारकांना आता क्यूआर कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिकांद्वारे धान्य वितरीत करण्यात येणार आहे. खात्याच्या या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना आधुनिक स्वरुपातील तसेच सुलभ शिधापत्रिका उपलब्ध होणार आहेत. 15 ऑगस्टपासून या मोहीमेला सुरुवात होणार असून राज्यातील 1 कोटी 86 लाख कुटुंबांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. या मोहिमेची सुरुवात सिंधुदुर्ग व गडचिरोली या जिल्ह्यांतून होणार आहे.
स्मार्ट शिधापत्रिकांसाठी ग्राहकांचे आधार कार्ड लिंक केले जाणार आहे. तसेच अचूक ओळख पटवण्यासठी चेहरा पडताळणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. 15 ऑगस्टपासून 26 जानेवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने राज्यभर स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारकांना अनेक वर्ष कागदी शिधापत्रिकांचा वापर करावा लागत होता. यावेळी त्या फाटल्याने खराब होणे तसेच गहाळ होणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या सार्वजनिक वितरण प्रणालीतील कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी या निर्णयाची मदत होणार आहे. क्यूआर कोडचा समावेश असलेल्या स्मार्ट शिधापत्रिका सुरुवातीला सिंधुदुर्ग आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर वितरीत केल्या जातील.
राज्यात पिवळ्या व केसरी रंगाच्या शिधापत्रिकाधारकांची संख्या ही 1 कोटी 86 लाख इतकी आहे तर 25 लाख शिधापत्रिकाधारक हे अंतोद्य अन्न योजनेचे लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेत 1 कोटी 61 लाख शिधापत्रिकाधारक आहेत. सफेद रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना तुर्तास क्यूआर कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत. पीपीएल शेतकरी तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना या स्मार्ट शिधापत्रिका निशुल्क दिल्या जाणार आहेत.














