LIVE UPDATES

'सिंधुरत्न'ला स्थगिती नाही !

सोशल ऑडिटनंतर योजनेस मुदतवाढ : आम. दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: June 28, 2025 15:05 PM
views 142  views

सावंतवाडी : सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ मिळायची आहे. सोशल ऑडिटची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर ही मुदतवाढ मिळणार आहे. स्थगितीचा विषय नसून वेळ पडली तर पालकमंत्री नितेश राणे अर्थमंत्री अजित पवारांकडे येतील याची मला खात्री आहे. त्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांनी त्याची काळजी करू नये असा खोचक टोला माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी लगावत टीकेचा समाचार घेतला. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस सावंतवाडीत की मडुरा येथे असा वाद होता. टर्मिनस सावंतवाडीतच असल्यानं गाडी तिथून सुटते व थांबते. रेल्वे टर्मिनसच्या उर्वरीत कामासाठी आणखीन निधीची गरज आहे. कोकण रेल्वेचे आर्थिक परिस्थिती नसल्यानं ते रखडल‌. त्यामुळे सिंधुरत्न मधून निधी देण्याची सोय केली आहे. पाण्याची समस्या होती. ती अडचण देखील आम्ही दूर केली आहे असं श्री. केसरकर म्हणाले.

तसेच हिंदी सक्ती महाराष्ट्रात नाही. पाचवी नंतर हिंदी विषय फार आधीपासून आहे. नवीन शैक्षणिक धोरणात पहिली ते चौथीसाठी पर्यायी भाषा आहेत. सुकाणू समितीनं याबाबत निर्णय घेतला आहे. दोनच भाषा मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा सक्तीच्या आहेत. कुठली भाषा घ्यावी हे विद्यार्थ्यांवर असेल. ९ आंतरराष्ट्रीय भाषा विद्यार्थी शिकू शकता. मात्र, मराठी भाषा ही शिकावीच लागेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हा कौटुंबिक प्रश्न आहे. मात्र, मराठी ही सक्तीचीच आहे. १२ वी नंतरही पुढचं शिक्षण मराठीत व्हावं यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण सुद्धा मराठीतुन घेता येणार आहे. मराठीसाठी आमच्या काळात जे केलं ते कोणीही केलेल नाही. राज ठाकरे यांना काही माहिती चुकीची दिली आहे. त्यांची भेट घेऊन संपूर्ण वस्तूस्थिती सांगितली पाहिजे. त्यानंतर त्यांनी हा मोर्चा मागे घ्यावी अशी अपेक्षा आहे. तर मुलांच्या पुस्तकांचा बोजा सरकारनं कमी करावा ही माझी मागणी कायम असल्याचे श्री. केसरकर म्हणाले. 

तसेच शक्तीपीठ महामार्गाची अलायमेंट बदलण्याची मागणी मी केली आहे. लवकरच यासाठी टीम येणार आहे. रेडी बंदाराला हा रस्ता जोडाला गेल्यास यांचा फायदा होईल. हा मार्ग शक्तीपीठ जोडणारा आहे. या महामार्गाचा कोकणाला फायदा होण्यासाठी माझा प्रयत्न आहे. बांदा ही बाजारपेठ गजबजलेली आहे. तिथे होणार नुकसान देखील यामुळे टळू शकेल असं मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, सातार्डा पुल दूरूस्ती सुचना आपण अधिकारी वर्गांला देणार आहे. आंबोलीत दुर्घटना घडू नयेत यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन टीम तैनात आहेत. यासाठी आवश्यक कीट त्यांना पुरविण्यात आल्याची माहिती श्री. केसरकर यांनी दिली. 

यावेळी मतदारसंघातील वीज समस्यांबाबत आज बैठक झाली. यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. सोमवारी ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याचं काम महावितरण करणार आहे. त्यांना आवश्यक वाहन मी आजच भाडेतत्त्वावर पुरवीत आहे. तसेच इतर साधनसामुग्रीची कमी पडणार नाही याची दक्षता घेतली आहे. तसेच विजेच व्यवस्थापन व आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या टीम गावागावात निवासाठी राहतील यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. दुर्गम भागात त्यांची सोय प्रशासन करेल अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, महावितरण अभियंता अभिमन्यू राख, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब आदी उपस्थित होते.