राज्यात मेगा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे निर्देश
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: May 05, 2026 14:57 PM
views 242  views

सिंधुदुर्ग  :  अनेक महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकणार असून, शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना ३१ मे २०२६ पर्यंत त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती ‘पवित्र’ पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा मार्ग खुला झाला आहे.

या भरती प्रक्रियेत शासनाने एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार, केवळ सध्या रिक्त असलेल्या जागाच नव्हे, तर मे २०२६ अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य रिक्त पदांचाही यात समावेश केला जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असून अधिकाधिक पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

भरती प्रक्रियेचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले असून, १ ते ३१ मे या कालावधीत सर्व शाळा व्यवस्थापनांनी त्यांच्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर जून महिन्यात उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार आणि गुणांच्या आधारे शाळांचे पसंतीक्रम (ऑप्शन्स) निवडण्याची संधी मिळणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असल्याने प्रक्रियेतील पारदर्शकता अधिक वाढेल.

कोण पात्र ?

गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. या परीक्षेसाठी सुमारे २ लाख २८ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यातील १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी आपली स्व-प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली असून, या पात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुलाखतींविना होणार निवड

भरती प्रक्रियेत वशिलेबाजीला आळा घालण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया होणार असल्याने मानवी हस्तक्षेप पूर्णपणे कमी होणार आहे. तसेच, सर्व शाळांना त्यांच्या आरक्षणानुसार बिंदुनामावली (रोस्टर) तपासूनच जाहिरात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची पदे पूर्णपणे गुणवत्तेनुसार आणि मुलाखतीशिवाय भरली जाणार आहेत. मात्र, खासगी संस्थांना प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याची मुभा देण्यात आली आहे.