LIVE UPDATES

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय

तुकडा बंदी कायदा रद्द
Edited by:
Published on: July 10, 2025 15:37 PM
views 291  views

मुंबई : राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून तुकडा बंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. याबाबत विधानसभेत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे, लवकरच या संदर्भात एक एसओपी तयार करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सुरू होती. अखेर हा कायदा आता सरकारने रद्द केला आहे. विधानसभेत या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात लवकरच महसूल, नगरविकास, जमाबंदी आयुक्त या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित केली जाईल. ही समिती एसओपी करेल. ज्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं काम अधिक सोप होईल, त्यांना सरकार दरबारी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

तुकडा बंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यात प्रतिबंध होता, एक, दोन, तीन अशी गुंठ्यामध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करता येत नव्हती, मात्र आता हे निर्बंध हटवले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या 12 जुलै 2021 च्या परिपत्रकानुसार, 1,2,3 अशी गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्याला निर्बंध आले होते. या परिपत्रकाला विरोधही झाला होता. हे प्रकरण न्यायालयतही गेलं होतं.

त्यानंतर राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार, राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिरायत जमिनीसाठी 20 गुंठे, तर बागायत जमिनीसाठी 10 गुंठे एवढं तुकड्याचं प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलं. बऱ्याचशा शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा शेतरस्त्यासाठी किंवा इतर काही कारणास्तव 1, 2, 3 गुठ्यांमध्ये जमिनी खरेदी किंवा विक्री करावी लागते. त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती. आता याच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक गोष्ट आहे.