
मुंबई : कोकणातील प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे ते देवगड या मार्गावर नवीन थेट एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार रवींद्र फाटक यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले.
कोकणातील विद्यार्थी, नोकरी- व्यवसायासाठी मुंबई-ठाणे परिसरात वास्तव्यास असलेले चाकरमानी तसेच सर्वसामान्य प्रवाशांची ही अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी आहे. ठाणे ते देवगड अशी थेट बस सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असून त्याचा मोठा लाभ कोकणवासीयांना मिळणार आहे.
कोकणवासीयांच्या भावना आणि गरजा लक्षात घेऊन या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली. जनतेच्या हितासाठी आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचेही आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितले.














