सोमवारपासून रिफायनरीसाठी माती सर्वेक्षण | विरोधाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लागु

ड्रिलींग करण्याच्या १ कि. मी. व्यासाच्या परिघामध्ये परवानगीशिवाय प्रवेश नाही
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 23, 2023 12:33 PM
views 417  views

राजापूर : कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाच्या सर्वेक्षणाची सुरुवात सोमवारपासून केली जाणार आहे. रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटना आणि काही ग्रामस्थांकडून या कामात अडथळा आणण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर बारसू सोलगाव या परिसरात राजापूरच्या तहसीलदार शितल जाधव यांनी आदेश जारी केले आहेत.


सोमवारी २४ एप्रिल म्हणजे उद्यापासून हे ड्रिलिंग करून माती सर्वेक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या परीसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २२ एप्रिल ते ३१ मे या कालावधीपर्यंत हे मनाई आदेश लागू असणार आहेत. बारसू सडा बारसू, पन्हळे तर्फे राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ या ड्रिलिंग करण्यात येणाऱ्या एक किलोमीटरच्या परिसरात हे आदेश लागू असणार आहेत.


भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात क्रूड ऑईल रिफायनिंग करणारी 'रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग' प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे सदर प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे. 'रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उद्योग' विरोधात काही स्थानिक ग्रामस्थ सक्रिय झाले आहेत. रिफायनरी विरोधी संघटना राजापूर तसेच मुंबई येथे स्थापन झालेल्या आहेत. त्या माध्यमातून ते विरोध दर्शवित आहेत. याबाबत रिफायनरी विरोधकांनी राजापूर शहरात मोर्चा, मेळावे, मुंबई येथील आझाद मैदान येथे धरणे, हिंसक आंदोलन अशा स्वरुपाची आंदोलने केली आहेत. तसेच इतर भागांतूनही आंदोलक अशा आंदोलनात सहभागी होत असतात, अशी टिप्पणी या आदेशात करण्यात आली आहे.


बारसू परिसरात औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याकरीता जमीन योग्य आहे किंवा कसे? याकरीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्राथमिक सुसाध्यता तपासणी करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण व भू सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळच्या कालावधीत 'रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग' प्रकल्प विरोधी भूमिका घेऊन लोकांचे नेतृत्व करणे, दंगल करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारी पात्र धाकदपटशा करणे, चिथावणी देणे, समान उद्देशासाठी बेकायदेशीर जमाव जमवून त्यात सामील होणे, इच्छा पूर्वक दुखापत पोहोचविणे, नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आवेग करणे, लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करणे, जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणे, असे गुन्हे घडलेले आहेत, असे स्पष्टपणे नमूद करत प्रशासनाचा मागील अनुभव लक्षात घेऊन हे मनाई आदेश जाहीर करण्यात आले आहेत.


राजापूर तालुक्यात प्रस्तावित ठिकाणी माती परीक्षणासाठी ड्रिलिंगच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर माती परीक्षणाच्या वेळी मोठ्या प्रमाणात प्रकल्प विरोधक व्यक्ती, ग्रामस्थ व त्यांचे सहकारी ड्रिलिंगचे काम करणाऱ्या लोकांना त्यांचे कामात व्यत्यय आणण्याची, बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करण्याची किंवा विरोध करण्याची, येथे जाण्या - येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याची, तेथील व्यक्तीच्या जिवितास धोका पोहोचविण्याची, तेथील सार्वजनिक शांततेस बाधा पोहोचविण्याची, तसेच समाज माध्यमांवर मेसेज, चित्र, व्हिडिओ प्रकाशित करून स्थानिक ग्रामस्थांना जनप्रक्षोभ चिथावणी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरात २२ एप्रिल पासून ते ३१ मे २०२३ या कालावधीपर्यंत राजापूर तालुक्यातील बारसू सडा बारसू, पन्हळे तर्फे राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ येथे ड्रिलींग करण्याच्या ठिकाणच्या १ कि.मी. व्यासाच्या परिघामध्ये प्रशासकीय व पोलीस यंत्रणा यांची परवानगी असल्याशिवाय प्रवेश आणि संचार करण्यास कलम १४४ (1.2.3) फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये मनाई आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.