राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच शिवरायांच्या नावावर जातीचं राजकारण !

कुडाळ इथल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 01, 2022 13:49 PM
views 257  views

कुडाळ : छत्रपती शिवरायांबाबतचे वाद हे केवळ जातीच्या राजकारणासाठी आहेत आणि याची सुरुवात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून झाल्याचा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत केलाय. राज ठाकरे आज सिंधूदूर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. 

राज ठाकरे म्हणाले, सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्य तसेच चित्रपटातील शिवइतिहासाबाबत वाद सुरू आहेत. मात्र, हे वाद जाणूनबुजून निर्माण केले जात असून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात असे जातीय वाद होत नव्हते किंवा फार कमी प्रमाणात होत होते. तेव्हा काय माणसं इतिहास वाचत नव्हती का? आता सगळेजण वाचायला लागलेत का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू झाले. शरद पवार आपल्या जाहीर भाषणांत कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. याबाबत मी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले होते की, 'शाहू-फुले-आंबेडकर हा एक विचार आहे, म्हणून मी त्यांचे नाव घेतो.' मात्र, हा मूळ विचार छत्रपती शिवाजी महाराजांचाच आहे. हा मूळ विचार घेऊन शाहू-फुले-आंबेडकर यांनी कार्य केले ना?

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीने 1999 पासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू केले. शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. मात्र, त्यांनी काही टोळ्या निर्माण केल्या आहेत. त्यांचा वापर करून मराठा व इतर समाजात फूट पाडली जाते. नंतर दोन्ही समाज आपल्या खिशात घालायचे, असे पवार यांचे राजकारण आहे.

राज ठाकरे म्हणाले, समान नागरी कायदा लागू करा, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. मात्र, केवळ राज्यात हा कायदा लागू करता येणार नाही. याबाबत केंद्राला कायदे बनवण्याचे अधिकार आहेत.