
रत्नागिरी : आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबायचा विचार करावा असे वाटते, असे म्हणत शिवसेना नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत पत्रकार परिषदेतून दिले आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, शिवसेना पक्षातून आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, याबाबतची खंतही भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली. तसेच, खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत मला शिवसेना पक्षात भाषणं करायची संधी मिळते, तसेच पक्षाच्या हितासाठी मी जे करायचे ते करतो. पण, मी कुणाची हुजरेगिरी कर नाहीत, हा ला हा किंवा ना ला ना... असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे, असेही भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेतून बोलून दाखवले. गुहागर मतदारसंघात आयोजित शिवसेना पक्षाच्या शिबिरानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
संजय राऊतांवर परखडपणे भाष्य - संजय राऊत मला दरवेळी सावरण्याची भाषा करतात. पण, मला भाषण करायला मिळत नाही म्हणून मी नाराज होत नाही. सगळ्या गोष्टींचे मला चांगलं भान आहे. पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी नाराज असा संदेश देण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न असतो. मात्र, पक्षाकडूनही कधीही तसे होत नाही. व्यासपीठावर शिवसेनेतील ज्येष्ठ नेते असतात, आदित्य ठाकरे हेही असतात. तरीही मला तिसऱ्या क्रमांकावर भाषण करायची संधी दिली जाते. माझ्यानंतर संजय राऊत आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषण करतात, असे जाधव यांनी सांगितले. मला भाषण करायला मिळाले पाहिजे असे अजिबात म्हणणे नाही, भाषणाबद्दल नाराजीचा विषयच नाही, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
मला मंत्रिपद का दिलं नाही याच उत्तर कोणाकडे असेल तर त्यांनी द्यावे. माझ्यावर झालेला अन्याय मी उघडपणे सांगितला, यापुढेही सांगेन, असेही भास्कर जाधव यांनी परखडपणे म्हटले.