LIVE UPDATES

कोकणात कृषी तंत्रज्ञानासाठी AI सेंटर स्थापनेचा प्रस्ताव

आ. शेखर निकमांनी घेतली शरद पवारांची भेट
Edited by: मनोज पवार
Published on: June 14, 2025 16:15 PM
views 159  views

चिपळूण :  कोकणातील कृषी विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांना विशेष चर्चेसाठी निमंत्रित केले होते.

या बैठकीत शरद पवार व आमदार निकम यांच्यात कोकणातील पारंपरिक शेती पद्धती, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, हवामानानुसार पीक पद्धती, शाश्वत शेती आणि युवांना कृषी क्षेत्रात आकर्षित करण्यासाठी एआयच्या सहाय्याने उभारणी होणाऱ्या नव्या प्रकल्पांबाबत सखोल चर्चा झाली.

शेखर निकम यांनी कोकणातील स्थानिक शेती अडचणी, जमिनीचा भूगोल, कोकणात पावसाळ्यामुळे होणारी आव्हाने आणि बाजारपेठेतील दुराव्याचे प्रश्न मांडले. यावर उत्तर देताना शरद पवार यांनी कृषी तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, हवामान अंदाज, पीक संरक्षण, रोबोटिक्स, ड्रोन वापर अशा विविध संकल्पनांची माहिती दिली.

शरद पवार यांनी या चर्चेदरम्यान स्पष्ट केले की, “कोकणसारख्या निसर्गसमृद्ध भागात जर शाश्वत शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली, तर येथील शेती अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळू शकते.”

या चर्चेचा पुढील टप्पा म्हणून, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी संशोधन संस्था, स्थानिक विद्यापीठे व तंत्रज्ञान कंपन्यांच्या सहभागाने लवकरच एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. कोकणात अत्याधुनिक एआय सेंटर उभारणीसाठी संभाव्य ठिकाणांची पाहणी व अभ्यास केला जाणार आहे.

या घडामोडीमुळे कोकणात आधुनिक कृषी क्रांतीचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेखर निकम यांनीही अशा उपक्रमांना पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली असून, भविष्यात कोकणातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.