नवी मुंबईतल्या डोंगरांप्रमाणे आता जंगलं पोखरली जातात..

वनंच राहिलीच नाही तर वनमंत्री काय कामाचे ? | आमदार निलेश राणेंनी ठेवलं मुद्द्यावर बोट
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 16, 2026 12:49 PM
views 171  views

सिंधुदुर्ग : शिंदे आणि नाईक यांच्या वादात आता आमदार निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका करत आमदार निलेश राणे यांनी  वनखात्याच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.

आमदार निलेश राणे यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे, मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत, मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो, कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे. अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाही, फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ला पैसे नाहीत, साधनसामुग्री नाही, DFO दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही. लाकूडतोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का असा प्रश्न पडायला लागलाय. वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जात आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाही ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो. वरील सगळे विषय गंभीर आहेत पण सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत. अशी टिका त्यांनी केली.