
मुंबई : आयुष्यभर मुंबईकरांची सेवा करणाऱ्या BEST च्या निवृत्त कर्मचाऱ्यांवर आज अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. निवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युइटी, भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन आणि इतर थकीत देणी महिनोनमहिने रखडल्याने हजारो निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन अंधारात गेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, “हक्काची रक्कम” मिळण्याची वाट पाहत असतानाच अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे.
“मुंबईला आयुष्य दिलं, पण वृद्धापकाळात सरकारने वाऱ्यावर सोडलं,” अशा शब्दांत निवृत्त कर्मचाऱ्यांचा संताप आता उफाळून आला आहे. आर्थिक अडचणी, औषधोपचारासाठी पैशांचा अभाव आणि घरखर्चाचा वाढता बोजा यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी तर कर्जबाजारी होऊन जगण्याची वेळ आल्याचे सांगितले. याबबत वारंवार आंदोलने, निवेदने आणि मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक वेळी फक्त आश्वासनांचे गाजर दाखवले गेले, असा आरोप केला जातोय. “बैठका होतात, चर्चा होते, पण निर्णय मात्र शून्य,” अशी तीव्र प्रतिक्रिया निवृत्त कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
राजकीय वर्तुळातही हा मुद्दा तापू लागला असून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “ज्यांनी आयुष्यभर मुंबईची चाकं फिरती ठेवली, त्यांनाच आज न्यायासाठी दारोदार फिरावं लागत आहे,” अशी टीका करण्यात येत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे वेळेवर न देण्यामागे केवळ आर्थिक अडचण नसून, “पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेमध्ये रोष निर्माण व्हावा यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे,” असा गंभीर आरोप निवृत्त बेस्ट अधिकारी सुधाकर राणे यांनी केलाय.
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आक्रोशामुळे हा प्रश्न आता केवळ थकीत देण्यांचा राहिलेला नाही, तर तो सरकारच्या संवेदनशीलतेची आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाची मोठी परीक्षा ठरत आहे. मुंबईकरांची सेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अखेर न्याय कधी मिळणार, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकही विचारू लागले आहेत.














