मुंबई विजयदुर्ग सागरी रो रो ला दापोलीत थांबा मिळावा

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्री नितेश राणेंकडे मागणी
Edited by:
Published on: March 04, 2026 20:31 PM
views 29  views

मुंबई : मुंबई ते कोकण प्रवास अतिजलद करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू केली आहे. ही सेवा मुंबई ते विजयदुर्ग व विजयदुर्ग ते मुंबई अशी थेट असल्याने याचा फायदा दापोली वासियांना व्हावा यासाठी हर्णे बंदरात या रो रो ला थांबा देण्याची मागणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. मंत्रालयातील मंत्री नितेश राणे यांच्या दालनात भेट घेत त्यांनी ही निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

एक मार्च पासून मुंबई-तळकोकण रो-रो बोटसेवा थाटामाटात मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. कोकणवासीयांनी दोन दिवसात या नवीन जलप्रवासाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला ही या जलसेवेचा उपयोग व्हावा यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही मागणी केली आहे. यावेळी पदुमचे सचिव एन रामास्वामी, मत्स्य आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी व इतर अधिकारी उपस्थित होते.

सदरची ही सेवा मुंबई ते कोकण प्रवासासाठी अतिजलद वाहतुकीचा पर्याय ठरणार असून यामुळे सागरी दळणवळण सुकर होणार असल्याचे मंत्री कदम यांनी निवेदनात नमूद करून हर्णे बंदर येथे सद्यस्थितीत जेट्टीचे बांधकाम सुरू असल्याचे म्हंटले आहे. तसेच कोकणातील दापोली तालुक्यात प्रवासासाठी रेल्वे मार्गाची सुविधा नसल्याने प्रवाशांना सागरी मार्गाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे हर्णे बंदर येथे रो-रो सेवेचा थांबा दिल्यास सागरी दळणवळणास अधिक चालना मिळेल असे ही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केल आहे.