
मुंबई : विवेक जागर संस्था अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई जिल्ह्याच्यावतीने महाराष्ट्रभर जनप्रक्षोभित झालेल्या भोंदूबाबा अशोक खरात या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा विरोधी जनजागृती मोहीम घेण्यात आली. हि मोहीम सुविधा शॉप जवळ, दादर स्टेशन बाहेर, दादर ( पश्चिम ), मुंबई येथे २९ मार्च रोजी झाली. यावेळी महारष्ट्र अंनिसचे राज्य पदाधिकारी मुंबईचे विजय परब, नंदकिशोर तळाशीलकर, रुपेश शोभा, नवी मुंबईचे राजेंद्र पंडित, जिल्ह्याच्या दादर, दहिसर, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर या सर्व शाखांचे कार्यकर्ते, इतर जिल्ह्याचे कार्यकर्ते, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुंबई विभागचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आनंद पटवर्धन, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे शरद डीचोलकर यांच्या उपस्थितीत तसेच हितचिंतक व समविचारी संघटना, संस्था यांनी या जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला होता.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने सबंध महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. हे कृत्य केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे नसून ते एक हितसंबंधातून घडून येणारे बुवाबाजीचे गंभीर प्रकरण आहे. अंधश्रद्धेचा हा विळखा वेळीच ओळखून महाराष्ट्रातील इतरही बाबा, बुवा, फकीर, पाद्री, तांत्रिक मांत्रिक, इत्यादिंचा शोध घेऊन सरकारने त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी आपण जनतेशी संवाद व पोस्टरच्या, गीतांच्या माध्यमातून, क्रियाशील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम करण्यात आली.
आज २१ व्यां शतकात येऊनही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव जनतेतून दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे घेतलेल्या ज्ञानाचा चुकीचं वापर करने किंवा योग्य वापर करण्यास न जमणे. सततचे तणाव, भीती आणि हव्यास तसेच रूढी परंपरांचा पगडा यातून महिलांना काय पुरुषांना सुद्धा बाहेर पडता येत नाहीये. महिलांच्या पारिवारिक, शारीरिक समस्या, भीती, दडपण, पुरुषांच्या करिअर आणि उद्योगधंद्यातील समस्या या झटपट कशा निकाली लागतील, परिवारांच्या अनामिक अपेक्षा, या सगळ्या गोष्टींचा फायदा या भोंदूबाबा अशोक खरातनी आणि यासारख्या अशा असंख्य भोंदूनी घेतलेला, महिलांचे केलेलं लैंगिक शोषण, केलेले अनेक गुन्हे आपण अनेक बातम्यांमध्ये रोज वाचत आहोत. या सगळ्या गोष्टीत महिला या जास्त संख्येने बळी पडलेल्या समाजात चित्र दिसून आलेले आहे. प्रचंड संताप जनतेत होत आहे. याची कारणे जनतेने आत्मचिंतन, समाजचिंतन करून कधी शोधलेली आहेत का ? असा सवालही अंनिसने केला आहे.
जसे अंकज्योतिष, फलज्योतिष, हस्तज्योतिष, रत्नज्योतिष, वास्तूज्योतिष, फेस आणि माईंड रीडिंग, राशिभविष्य, कर्मकांड, मंतरलेले पाणी, वस्तू, प्रसाद देवून, अघोरी पूजा घालून नरबळी, पुनर्जन्म कथा यातून माणसाचं भले होत असते तर ग्रहांवर यान पाठवण्याचा घाट घातलाच नसतं कोणी. इथे बसून अवकाशाचे दर्शन करत बसलो असतो. हि जगातील युद्ध होण्याची, इतके नुकसान होण्याची वेळ जगभर, देशांत आलीच नसती. केवळ मनातून मंत्र म्हणून, लिंबू मिर्ची टाकून हे थांबवता आले असते. प्रत्येक संकट, समस्यांना सोडविण्याचे हे असले मार्ग नाहीत. यावेळी संदेश बालगुडे यांनी ज्योतिषी शास्त्र नाही याची जनजागृती केली त्याचा उदाहरण म्हणजे भोंदू अशोक खरातला आपल्याला कधी अटक होईल हे कळलच नाही, तसेच दुबईला ज्योतिष शी महासंघाची बैठक होती आणि युद्ध चालू झालं युद्ध चालू झाल्यावर ज्योतिष आणि कुंडली मांडून आपली मुक्ती कधी आहे हे बघितलं पाहिजे होतं. पण तसे न करता त्यांनी भारतात येण्यासाठी भारत सरकारला विमान पाठवण्याची विनंती केली होती. बहिणाबाई सारखी कवियत्री सांगते नको ज्योतिषा माझ्या दारी येऊन माझा हात पाहू. पण आज सुशिक्षित ज्योतिषाच्या मागे लागत आहे याबद्दलही जनजागृती आवश्यक असल्याचं अंनिसने सांगितलं.
या विज्ञानाचा, शिक्षणाचा, स्वतःच्या आत्मविश्वासाची, नितीमुल्यांची, परमेश्वरावरील निर्मळ श्रद्धेची त्याचबरोबर आपल्याला मेहनत करण्याची गरज आहे. माणुसकीला काळीमा फासणारे हे सगळे कृत्य,भोंदूबुवा त्याच बरोबर यांना अधिन होणारी जनता यात इतके दिवस यांचा शोध घेण्यात कमी पडलेले तुम्ही आम्ही सर्वजण कुठे तरी या पिडीतांसाठी जबाबदार आहोत. हे सर्व सजगपणे या पुरोगामी महाराष्ट्रात घडणारे प्रकार थांबायला हवं. कोणी कोणत्याही प्रकारे या पीडित परिवारांची, महिलांची मानसिक हिंसा न करता, नको ती शेरेबाजी न करून. कोणत्याही अधिकारांचा या पीडितांच्या विरोधात गैरवापर न करता, केवळ आणि केवळ माणूस म्हणून संवेदनशील राहून कायद्याच्या आणि जनजागृतीच्या मार्गाने दोषींवर कठोर कारवाई करून या पीडित झालेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण राज्याचे सर्वच स्तरातील नागरिक कर्तव्य म्हणून कटिबद्ध आहोत. त्यासाठी ज्यांना अशा भोंदूचे जे वाईट अनुभव आलेत ती तक्रार व माहिती नोंदवण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. अशा झालेल्या, होत असलेल्या घटनांची तक्रार नोंद देणे व होणे. त्यावर योग्य ती कारवाई होणे आवश्यकच आहे. असे अनेक नागरिकांनी, उपस्थितांनी कार्यकर्त्यांशी संवादातून मांडले.
जादूटोणाविरोधी कायद्याची जनजागृती करताना नंदकिशोर तळाशीलकर यांनी सांगितले हा कायदा असल्यामुळेच भोंदू खरात सारखे अनेक बुवा बाबा तांत्रिक मांत्रिक आत आहेत. हा कायदा सर्व धर्मीयांना लागू आहे. परंतु या कायद्याला विरोध करणारे ही काही लोक आहेत कारण त्यांचे जादूटोण्याचे तंत्र मंत्राचे काळे धंदे बंद होण्याची, उघडकीस येण्याची त्यांना शक्यता वाटते अशा लोकांनी मंत्रालयात 24 मार्चला सामाजिक न्याय विभागाला बैठक लावायला लावली होती. जादूटोणा विरोधी कायदा होऊ नये म्हणून विरोध केलेले हीच मंडळी होती परंतु खरात प्रकरण समाज माध्यमे व अनिसची जनजागृती याच्या दबावामुळे ती मीटिंग रद्द करायला लागली. जादूटोणाविरोधी कायद्याचे नियम व अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना सर्व पोलीस स्टेशनमध्ये होण्याची गरजेचे आहे त्यामुळे अशा घटनांना आळा बसेल. जादूटोणाविरोधी कायद्याची जनजागृती प्रचार समिती आहे ती पुन्हा कार्यरत करावी असेही सरकारला आवाहन केलेले आहे.
या जनजागृतीला महिला व नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. काही महिला यांनी संतप्त प्रतिक्रिया ही दिल्या भोंदू अशोक खरात याच्याबरोबर काही पुरुषही सामील आहेत राजकीय नेते सामील आहेत त्यांनाही शिक्षा झाल्या पाहिजे. महाराष्ट्र अंनिस जनजागृती सहभागात आम्ही सहभागी होऊ शकतो म्हणून स्वतःचे संपर्क नंबर पण दिलेत.
महाराष्ट्र अंनिसने मुंबई जिल्ह्याचे बुवाबाजीचे प्रकार रोखण्यासाठी आणि पीडितांना मदत मिळवून देण्यासाठी खालील हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत.
विजय परब (मुंबई जिल्हा) - 98690 77462
अर्चना सोनवणे ( दादर शाखा ) 98215 22626
यश सुर्यवंशी ( दहिसर शाखा ) - 96650 40818
रुपेश शोभा ( कुर्ला, चेंबूर शाखा ) - 90042 82663
प्रियांका सवाखंडे ( घाटकोपर शाखा) - 98925 16618
पीडितांना तक्रार करण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन , गरजेनुसार समुपदेशन मोफत दिले जाईल. पीडितांची आणि प्रकरणे, गुन्हे नोंदविणाऱ्या तक्रारदारांची ओळख गुप्त ठेवली जाईल. तसेच महाराष्ट्र अंनिस राज्य पातळीवरिल मदत क्रमांक
कृष्णा चांदगुडे - 98226 30378
महेंद्र दातरांगे - 97632 92356
प्रत्येक जिल्ह्यांसाठीही असे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत. तुमच्या जिल्ह्यांच्या शाखांशी संपर्क करून माहिती घेऊन अशी प्रकरणे नोंदवू शकता व तुमच्या गावातील, नगरातील पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवू शकता.














