कुणाचा बळी जाणार, हे मंत्री केसरकरांना चांगलच माहितीय : अर्चना घारे-परब

मॉं कामाख्या देवी तीचा महीमा दाखवेलच | अर्चना परब यांचा हल्लाबोल !
Edited by: विनायक गांवस
Published on: November 26, 2022 11:59 AM
views 387  views

सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळ आज गुवाहाटीला रवाना झालं. देवीचं दर्शन घेवून राज्यातील जनतेच्या भल्यासाठी आशिर्वाद घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. दरम्यान, या दौ-यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, तुम्ही कोणाचा बळी देणार ? याला मंत्री दीपक केसरकर यांनी  उत्तर देताना, महाराष्ट्राच्या विकासाआड येणा-यांचा बळी देणार असं मत व्यक्त केले होते‌. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी सडकून टीका करत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर प्रहार केला आहे.


आमचे नेते शरद पवार, अजित पवार यांनी महाराष्ट्रात विकासाची गंगा घरोघरी पोहचवली आहे हे सगळ्या जनतेला ठावूक आहे. विकास कुणी केला ?, विकासाच्या आड कोण आलं ? हे देखील जनतेला ज्ञात असून विकासाच्या आड येणाऱ्या विचारांचा बळी जाणार असेल तर पुढच्या वेळी कुणाचा बळी जाणार हे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना देखील चांगलच माहीत आहे. मॉं कामाख्या देवी तीचा महीमा दाखवेलच असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे-परब यांनी केला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला विभागाच्या दर्शना बाबर-देसाई आदी उपस्थित होते.