
पोलादपूर : रायगडच्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या घाटात एक स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
अपघातामध्ये मृत झालेल्या आठ जणांचा ग्रूप 23 तारखेला दापोली हर्णे बीच इथं फिरायला गेला होता. 24 तारखेला (रविवारी) परतत असताना त्यांच्या गाडीला आंबेनळी घाटात दाभिळ टोक या ठिकाणी अपघात झाला.स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळल्यामुळे मृत प्रवाशांचे मृतदेह वर आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री 10 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून पोलीस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. सध्या दोरीला स्ट्रेचर बांधून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे मृतदेह घेऊन रुग्णवाहिका पोलादपूरमधील सरकारी रुग्णालयात गेली आहे.प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25) आणि नितीन किसन नायकोंडे (वय 35) यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातामधील मृत प्रवासी हे कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याचे समजते आहे.














