गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना खुशखबर

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: July 15, 2025 15:13 PM
views 247  views

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच कोकणातील चाकरमान्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. आपल्या लाडक्या बाप्पााच्या स्वागतासाठी प्रत्येक चाकरमानी हा कोकणात गावी जात असतो. आता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ पूर्णपणे सज्ज झाले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल ५००० जादा गाड्या सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत असून यासाठी खास २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत एसटी बस उपलब्ध असणार आहेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबद्दलची माहिती दिली.

नुकतंच एसटी महामंडळाची एक बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले. गणपती उत्सव हा कोकणच्या चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ नफा-तोट्याचा विचार न करता धावत असते. यावर्षी सुमारे ५००० जादा बसेस कोकणातील रस्त्यांवर धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसेसचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळ npublic.msrtcors.com वर उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय, बसस्थानकांवरून किंवा MSRTC Bus Reservation ॲपव्दारे देखील आरक्षण करता येईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

नुकत्याच पार पडलेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठीही एसटी महामंडळाने ५२०० जादा बसेस सोडल्या होत्या. ज्याला भाविक आणि प्रवाशांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. त्याच यशानंतर, गणेशोत्सवासाठीही एसटीने ५००० जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. या जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणासोबतच गट आरक्षणाची सोयही उपलब्ध असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तिकिट दरात सवलत मिळणार आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. गट आरक्षणाची प्रक्रिया २२ जुलैपासून सुरू होत आहे. येत्या २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून जादा बसेस कोकणासाठी सुटतील. गेल्या वर्षी ४३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या, त्या तुलनेत यंदा ७०० बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत चालावी यासाठी बसस्थानके आणि बसथांब्यांवर एसटीचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच, कोकणातील महामार्गांवर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथके (ब्रेकडाऊन व्हॅन) देखील तैनात करण्यात येणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.