सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी AI प्रकल्प : मंत्री नितेश राणे

Edited by:
Published on: March 27, 2026 17:58 PM
views 48  views

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरवातीला काजू व आंब्यासाठी प्रत्येकी 200 अशा एकूण 400 शेतकऱ्यांची निवड करून प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यात आंबा आणि काजू उत्पादकांचा समावेश आहे, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसंदर्भात A.I. चा वापर करण्याबाबत एडीटी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे निलेश नलावडे यांनी सादरीकरण केले. यावेळी दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे,  संचालक (कृषी व नवोपक्रम) डॉ. भूषण गोसावी,  एडीटी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय तज्ज्ञ (मृदा विज्ञान) डॉ. विवेक भोईटे,  सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग डॉ. वैभव शिंदे , धोरणात्मक सल्लागार डॉ. संतोष देशमुख, शास्त्रज्ञ डॉ. संजनी साळुंखे उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, प्रकल्पसाठी शेतकऱ्यांचा मूलभूत डेटा, नाव, संपर्क क्रमांक, गाव आदी माहिती संकलित करून त्यांच्या शेतीचे डिजिटायझेशन करावे. पहिल्या दोनशे शेतकऱ्यांमध्ये प्रकल्प यशस्वीपणे राबविल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यात येईल.  हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर  इतर शेतकरीही स्वयंस्फूर्तीने या तंत्रज्ञानाचा स्वीकार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एडीटी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय तज्ञांनी सांगितले की, प्रकल्प राबवितांना आवश्यक ठिकाणी सेन्सर्स बसवून माती, झाडे आणि उत्पादन स्थितीचे परीक्षण करण्यात येईल.या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना केवळ प्रशिक्षण नव्हे तरकृत्रिम बुद्धिमत्ता (AI)  तंत्रज्ञानाबाबत जागरूकता दिली जाईल. विभागनिहाय गट तयार करून प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जाणार आहेत. सुमारे 150 दिवसांचा पहिला टप्पा ठेवण्यात आला असून 20-25 शेतकऱ्यांच्या गटांमध्ये काम केले जाईल.

पारंपरिक पद्धतीत 4-5 दिवस लागणारी फवारणी ड्रोनच्या साहाय्याने काही तासांत पूर्ण होऊ शकते, त्यामुळे रोग नियंत्रण जलद आणि प्रभावी होईल, असे त्यांनी नमूद केले. यासोबतच यांत्रिकीकरण वाढवण्यावरही भर देण्यात येणार आहे. AI आधारित प्रिडिक्टिव्ह मॉडेलद्वारे पिकांवरील रोगांचा अंदाज आधीच घेता येईल, ज्यामुळे अनावश्यक कीटकनाशक वापर आणि ब्लॅक मार्केटिंगवर नियंत्रण येईल, असेही एडीटी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय तज्ञांनी सांगितले.