
जनतेला आणि प्रशासनाला अगदी पहिल्या दिवसापासून सतत सतर्क करण्याचं काम भाजपचे सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे यांनी केलं. कोकणात आ. नितेश राणे यांनी 'जागत्या' ची भूमिका घेतली. आतापर्यंत आ. नितेश राणे यांनी बजावलेली कामगिरी एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणाऱ्या कृतिशील राजकीय नेत्याचीच होती!, याकडे मुळीच दुर्लक्ष करता येण्या जोगे नाही. अगदी कमी वयात नितेश राणे यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या राजकीय नेतृत्वाची चुणूक देखील दाखविली आहे. माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणेंचा आजवरचा वादळी प्रवास आणि आता त्यांच्याच तालमीत तयार इLझालेल्या आमदार नितेश यांचा राजकीय झंझावात, अचूक निर्णय क्षमता आणि त्यांच्या एका हाकेसरशी त्यांच्या पाठीशी जमा होणारे अन जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांचे मोहोळ पाहता नितेश राणे हे राज्यातील नव्या राजकीय समीकरणातील आश्वासक तरुण नेतृत्व ठरले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चढता आलेख विरोधकांनी कितीही नाकारला तरी ज्येष्ठ नेते नाम़ नारायण राणे यांच्यामुळे राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कोकणातील एकमेव खा. नारायण राणे यांचाच आतापर्यंत दबदबा राहिलेला आहे. प्रशासनातला जाणता राजाच म्हणून नारायण राणेंची ओळख महाराष्ट्रात आहे. सिंधुदुर्गातील बदलत्या राजकारणात खा. राणें यांच्या पाठोपाठ युवा नेते आमदार नितेश राणे यांची छाप पडत चालली आहे. दिलेला शब्द पाळणारे, तरुणांना दिशादर्शक असे युवा नेतृत्व आमदार नितेश राणेंमध्ये असल्याने त्यांचा प्रभाव जनतेवर आहे. सिंधुदुर्गातील बदलत्या राजकारणात नितेश राणेंचे प्रभावी नेतृत्व सद्याच्या राजकारणात प्रकर्षाने उठून दिसत आहे.
नितेश राणे एक अभ्यासू व्यक्तिमत्व, सामाजिक प्रश्नांची जाण ठेवून विधानसभा सभागृहात असो किंवा सभागृहाबाहेर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सातत्याने सर्वसामान्यांच्या न्यायासाठी एक आक्रमक भूमिका घेत न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नितेश नारायण राणे अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात नितेश राणे एक अभ्यासू दबंग कणखर नेतृत्व म्हणून नावारुपास आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या असंख्य चाहत्यांनी मागणी करत कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. त्यामुळे विविध सामाजिक उपक्रम घेत २०१४ साली आमदार नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून आपल्या राजकीय वाटचालीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघ जिंकत इतिहास रचला. भाजपचा गड समजला जाणाऱ्या मतदारसंघात संपूर्ण कोकणात एकमेव काँग्रेसचा आमदार म्हणून त्यांचा विजय होता. त्याही परिस्थितीत महाराष्ट्र शासनाविरोधात कोकणाचे प्रश्न अधिवेशनात मांडले, एक आक्रमक नेतृत्वाची चुणूक नितेश राणे यांनी गतकालीन पाच वर्षात दाखवून दिली. बदलत्या राजकीय परिस्थितीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाचे भारतीय जनता पार्टीत विलीनीकरण केले. त्यानंतर कणकवली विधानसभा मतदारसंघातून २०१९ साली शिवसेनेला पराभूत करत नितेश राणे यांनी दमदार विजय मिळवला. सलग दुसऱ्या टर्मसाठी कणकवली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने त्यांना विजयी केले. आणि आत्ताच्या निवडणुकीतही जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला. पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. आणि विकासकामांचा आणि धडाकेबाज निर्णयांचा अक्षरश: धडाका लावला. मच्छीमारांच्या प्रश्नांसोबतच सर्वसामान्यांच्या पायाभूत आणि महत्त्वाच्या प्रश्नांना हातावेगळे केले.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर वावरताना आ. नितेश राणेंचा नेहमी आक्रमकपणा दिसतो, तो आक्रमकपणा समस्यांना तडीस नेण्यासाठी असतो. जो कार्यकर्ता पक्षासाठी अहोरात्र काम करतो, त्याला न्याय देण्याची भूमिका त्यांची असते. गेल्या १५ वर्षांत आ. नितेश राणेंनी याच पद्धतीने काम केले. कार्यकत्यांच्या सुखदुः खात नेहमीच साथ पुरवली. कार्यकर्त्यांच्या कुठल्याही प्रसंगात लागणारी ताकद देण्याची भूमिका नितेश राणे यांची राहिली. आता तर मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे पुढील ५ वर्षांत एक आधार म्हणून नितेश राणेंची ताकद महायुतीच्या कार्यकर्त्यांना मिळणार आहे. नितेश राणे यांचे एमबीएपर्यंतचे शिक्षण लंडनमध्ये झाले आहे. वडील नारायण राणेंनी शिवसेनेची साथ सोडल्यानंतर त्यांना राजकारणात हातभार लावण्यासाठी ते मायदेशी परतले होते. त्यांनी स्वाभिमानी संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या माध्यमातून हजारो युवक-युवतींच्या हाताला रोजगार देण्याचा विक्रम रचला आहे. असे असले तरी नितेश राणेंची राजकीय कारकीर्दही मात्र तितकीच वादग्रस्त ठरली आहे. काँग्रेस पक्षात असताना गुजराती समाजाविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तर भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांचे हिंदुत्वाशी सूत जुळल्याने ते मुस्लीम समाजाला लक्ष्य करताना हिंदुत्वाचे कडवे समर्थक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. गेल्या दहा वर्षांत रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांच्या हातांना काम मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
नितेेश राणे यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले आहे, आणि तेही कॅबिनेट मंत्रिपद. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती प्राप्त होईल, अशी आशा आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पायाभूत सुविधांबरोबरच आरोग्य, शैक्षणिक, रोजगार, कृषी क्षेत्राचा सर्वंकष विकास आवश्यक आहे. त्याअनुषंगाने नियोजनबद्ध आराखडा आखून जिल्ह्याच्या विकासास पोषक असे प्रकल्प आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यटनातून रोजगारनिर्मिती साधण्यासाठी नितेशजींचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. एआयच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात विकास साधण्यासोबत तंत्रज्ञान आणि विकासाची नवी पहाट नक्कीच उजाडेल, अशी आशा वाटते. त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मण आडाव
उपसंपादक
दै. कोकणसाद