
समर्थ रामदास स्वामींनी एका ठिकाणी म्हटलेय, सच्चेपणा, चारित्र्यसंपन्नता, दूरदृष्टी, क्षात्रतेज, चतुरस्रता, शहाणपण आदी गुणांचा परिपाक अर्थात ‘राजकारण’. महाराष्ट्राच्या राजकारणात मोजक्याच काही युवा राजकारण्यांची नावे सध्या चर्चेत आहेत. त्यात सर्वात आधी ज्यांचे नाव घेतले जाते, ते म्हणजे नितेशजी राणे यांचे! त्यांच्यातील आक्रमकपणा, सामाजिक तळमळ, दृरदृष्टीच्या संकल्पना आणि सर्वसामान्यांचे उच्चाटन करण्याचा संकल्प यातून ते युवकांचे ‘स्टाईल आयकॉन’ ठरले आहेत. त्यांच्यातील ‘टेक्नोसॅव्ही’ वृत्तीमुळे सोशल मिडियावर ते सदैव ॲक्टीव्ह दिसतील. पर्यटनातून रोजगार आणि त्यातून सिंधुदुर्गची समृद्धी पाहण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. त्यासाठीच आपल्याकडे असलेल्या बंदर आणि मत्स्य खात्याचा पुरेपूर वापर करून कोकणच्या किनारपट्टीला अर्थकारणाची झालर लावण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीच्या शृंखला विस्तारण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. एकीकडे प्रशासनाला गतिमान करून पायाभूत सुविधांची उभारणी करताना आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सुविधांना त्यांनी आपल्या कार्यातून अग्रक्रम दिल्याचे दिसते. त्यामुळेच गेल्या वर्षभरात जिल्ह्याच्या सर्वांगीण क्षेत्रात बदलाचे वारे वाहू लागले आहे. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे मार्गक्रमण करीत आहे, तर दुसरीकडे विकासाच्या नव्या संकल्पना पुढे येत आहेत.
समाजाभिमुख विचार अंगी बाळगताना निर्णय क्षमता आणि प्रगतशील विचारसरणी आवश्यक असते. दांडगा अनुभव, विकासाचे व्हिजन, दूरदृष्टी आणि महत्वाचे म्हणजे प्रशासनावर तगडी कमांड असलेले नेतृत्व म्हणून नारायण राणेंची ओळख आहे. तेच गुण त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यात उतरले. ज्या स्वाभिमानी संघटनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात नितेश राणे यांनी केली, तोच स्वाभिमान हिंदुत्वाच्या रूपाने महाराष्ट्राने अनुभवला. सर्वसामान्यांचे दु:ख, यातना, समस्यांचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात नितेश राणे यांचा हातखंडा आहे. आता कॅबिनेट मंत्री पदाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन, कृषी, आरोग्य, शैक्षणिक विकास साधताना सर्वसामान्य हा केंद्रबिंदू ठेवून राणेंचा बुलंद आवाज विधानसभेत नेहमी गर्जत असतो.
स्वाभिमानी संघटनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची त्यांनी सुरुवात केली. तर २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत नितेश राणे जिंकले आणि २०१९ मध्ये पक्षांतर करत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत कणकवलीचा गड सर केला. कणकवली विधानसभा मतदारसंघावर राणे कुटुंबीयांचे प्राबल्य नेहमी राहिले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर कणकवली मतदारसंघात आपली राजकीय पकड घट्ट केली. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातील नितेश राणे यांनी प्रारंभीच्या काळात समाजकारणात पाय रोवले. आपल्या आक्रमक शैलीने त्यांनी जनतेच्या मुलभूत प्रश्नांना वाचा फोडली. यानंतर २०१४ मध्ये त्यांनी कणकवलीतून पहिल्यांदा निवडणूक लढवली. यामध्ये राणेंनी भाजपा पक्षाचे प्रमोद जठार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. २०१९च्या निवडणुकीत कोकणातील कणकवली विधानसभा मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरली होती. निवडणुकीच्या तोंडावर नितेश राणे यांनी पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला. तर भाजपकडून त्यांना कणकवलीतून तिकीटही मिळाले. यादरम्यान शिवसेना भाजपची युती असतानाही शिवसेनेने सतीश सावंत यांना नितेश राणेंविरोधात मैदानात उतरवले होते. राणेंनी सावंतांविरोधात कडवी लढत दिली आणि २८ हजार ११६ मतांनी सावंतांना पराभवाची धूळ चारली. त्यांना जिल्हा बँकेच्या गैरव्यवहारात गुंतविण्याचाही यावेळी प्रयत्न झाला होता.
नितेश राणे यांचे एमबीएपर्यंतचे शिक्षण लंडनमध्ये झाले आहे. वडील नारायण राणेंनी शिवसेनेची साथ सोडल्यानंतर त्यांना राजकारणात हातभार लावण्यासाठी ते मायदेशी परतले होते. त्यांनी स्वाभिमानी संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या माध्यमातून हजारो युवक-युवतींच्या हाताला रोजगार देण्याचा विक्रम रचला आहे. असे असले तरी नितेश राणेंची राजकीय कारकीर्दही मात्र तितकीच वादग्रस्त ठरली आहे. काँग्रेस पक्षात असताना गुजराती समाजाविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तर भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांचे हिंदुत्वाशी सूत जुळल्याने ते मुस्लीम समाजाला लक्ष्य करताना हिंदुत्वाचे कडवे समर्थक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. गेल्या दहा वर्षांत रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांच्या हातांना काम मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
नितेश राणे २००५ मध्ये लंडनमधून जेव्हा भारतात परत आले, त्याचवेळी नारायण राणे हे शिवसेनेत बंड करून बाहेर पडले होते. त्यामुळे, वडिलांच्या राजकीय नव्या वाटेला साथ देत राजकीय जीवनातून त्यांनी नव्याने सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. त्यानुसार, २००६ साली नारायण राणे यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी संघटनेची स्थापना करण्यात आली. या स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून राज्यभर सामाजिक कार्य उभारण्यात आणि जनसंपर्क ठेवण्याचं काम नितेश यांनी केलं. २००९ मध्ये मुंबई पालिकेवर भव्य मोर्चा काढून आपल्या ताकदीची सर्वांना दखल घ्यायलानितेश राणे यांनी भाग पाडलं. त्यामुळे, नारायण राणेंचा मुलगा ही ओळख त्यांनी त्याचवेळी निर्माण केली. त्यामुळे या संघटनेतून संघटन आणि करारीपणाचे धडे त्यांनी निश्चितच घेतले.
नितेश राणे यांच्या प्रत्येक कृतीत नारायणराव राणे यांच्या संस्कारांचे दर्शन घडून येते. आज उदासिनतेने ग्रासलेल्या प्रशासनाला त्यांनी खडबडून जागे केले. आणि त्यांना कामाला लावले. त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे, रखडलेल्या विकास प्रकल्पांना गती मिळत आहे. लोकांची कामे वेळेत होत आहेत. आणि भ्रष्टाचाराला आळा बसला आहेे. कुठल्याही राज्यात अथवा जिल्ह्यात प्रशासनच जर गतिमान नसेल तर कुठलीच गोष्ट साध्य होत नाही, त्यासाठीच सर्वप्रथम प्रशासनाला सुतासारखे सरळ करून विकासकामांना गती देण्याचे महत्त्वपूर्ण काम नितेशजी यांनी केले. आणि त्याचे सुफल परिणाम सध्या दिसत आहेत. पर्यटनातून रोजगार आणि जिल्ह्याची समृद्धी हे त्यांचे दिव्य स्वप्न आहे. त्यासाठीच आपल्या मत्स्य आणि बंदर खात्याच्या माध्यमातून किनारपट्टी सुरक्षीत राखतानाच पर्यटनाच्या विविध संकल्पना त्यांनी पुढे आणल्या आहेत. प्रसंगी केंद्र आणि राज्य सरकारची मदत घेऊन तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी भविष्यातील जिल्ह्याचा सुवर्णमयी आराखडा बनविला आहे. पुढील काही वर्षांत त्याचे सुफल परिणाम दिसू लागतील. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
स्वप्नील परब
उपसंपादक
दै. कोकणसाद