LIVE UPDATES

कोकणच्‍या विकासाची ‘डायनॅमिक लीडरशीप’

'Dynamic Leadership' for Konkan's development
Edited by: ब्‍युरो न्यूज
Published on: June 23, 2025 12:42 PM
views 29  views

बारामतीकरांना "पवार" कळले, पण सिंधुदुर्ग वासियांना "राणे" कळायला उशीर झाला. अर्थात हे वाक्य आहे, एका पश्चिम महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष सेवानिवृत्त क्लास वन अधिकाऱ्याचे! यातून त्यांना एवढेच सांगायचं होत कि कोकणला माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि कुटुंबीयांनी ज्या उंचीवर नेलं, कोकणचा कायापालट करण्‍यासाठीच स्वतःला झोकून दिलं, त्याच राणेंना आणि त्यांच्या कुटुंबियांना मागील काही काळात पराकोटीच्या राजकीय संघर्षाला सामोर जावं लागलं. अगदी याउलट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अगदी कुटुंबात उभी फूट पडूनही तेथील जनतेने अजित पवार व सुप्रिया सुळे या दोन्ही पवारांना निवडून देत "पवार" म्हणजेच "बारामती" हे दाखवून दिले. मात्र काही वर्षांपूर्वी कोकणवासीय आणि सिंधुदुर्ग वासियांनी केलेली चूक कोकणला १०-१५ वर्षे मागे घेऊन गेली हि वस्तुस्थिती आहे. हे जरी कटू सत्य असले तरी याच राणे कुटुंबीयांवर पुन्हा एकदा कोकणी जनतेने दाखविलेला प्रामाणिक विश्वास आणि याच विश्वासाची परतफेड करण्यासाठी सज्ज झालेले ना. राणे यांचे सुपूत्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे होय. "सिंधुदुर्गच्या विकासाचा नवा आश्वासक चेहरा" म्हणून तमाम कोकणवासिय आज त्यांच्यामागे मोठ्या अपेक्षेने ठामपणे उभे राहिले आहेत. २३ जून त्यांचा वाढदिवस. याच निमित्ताने कोकणातील या आक्रमक आणि प्रत्यक्ष कृतीशील नेतृत्वावर टाकलेला हा प्रकाशझोत..


 २३ जून १९८२ ला मुंबईत जन्मलेले आणि कणकवली मतदारसंघातून हॅट्रिक करत नितेश राणे तिसऱ्यांदा आमदार झाले. नव्हे तर ते १५ डिसेंबर २४ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून  सामील झाले. त्यांच्यावर महाराष्ट्राचे बंदरे विकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार हाती घेतला. पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी ज्या पद्धतीने अतिशय अभ्यासपूर्ण आणि सूक्ष्म नियोजनाने जिल्हा प्रशासनाच्या सुशेगाद कारभाराला 'अश्वगती' देण्याचे सर्वप्रथम काम केलं. तर जिल्ह्यात सामाजिक स्वास्थ बिघडविणारे अवैध धंदे यापुढे सहन केले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. ड्रग्स, मटका, जुगार अशा अवैध कृत्यांना त्यांनी जाणीवपूर्वक कठोरतेने प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अवैध धंदेवाल्यांनीही नितेश राणे यांच्या या ॲक्शनला हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीचा  नितेश राणे यांचा हा आक्रमकपणा काही कालावधीने मवाळ होईल, अशी गणितेही बांधली. यात दोन नंबरवाले आणि त्यांना खाकी आड सपोर्ट करणारे काही घरचे भेदीही होते. मात्र "बोले तैसे चाले" आणि विशेषतः ना. राणे यांच्या मुशीत नव्हे तर घरातच सामाजिक बांधिलकीचे बाळकडू घेतलेल्या नितेश राणे यांनी आपल्या या निर्णयाची पुढे १०० टक्के अमलबजावणी होण्यात कोणाला तसूभरही सूट दिली नाही. त्यामुळे जिल्ह्याचे सामाजिक स्वास्थ ठीकठाक होण्यासाठी त्यांनी घेतलेल्या या पहिल्याच निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत झाले. त्यानंतर जिल्हा विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चासाठी प्नशासनात आवश्यक शिस्त आणली. काम करेल त्‍याच्‍या पाठीवर कौतुकाची थाप आणि कामचुकार मंडळींना योग्य चाप. यामुळे  त्यांच्या पालकमंत्री पदाच्या पहिल्याच आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग निधी खर्चात राज्यात अग्रस्थानी राहिला. जिल्हा नियोजन आराखड्याच्या २५० कोटींपैकी ९८% निधी खर्च होऊ शकला. तर गुणवत्तापूर्ण विकासाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. केंद्र व राज्याच्या योजनांमुळे पुढील वर्षासाठी ३०० कोटींचा आराखडा तयार करून घेतला. यापुढे जिल्हा नियोजनचा संपूर्ण निधी डिसेंबर अखेर खर्च होण्यासाठी चालू आर्थिक वर्षात त्यांनी सुरुवातीलाच जिल्हा नियोजन समिती बैठक आयोजित करून सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवला.  जिल्ह्यात रोजगार आणि पर्यटन उद्योगासाठी येणाऱ्या उद्योजकांसाठी तर त्यांनी जिल्ह्याची कवाडे खुली करून दिली आहेत. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात मोठे रोजगार व पर्यटन उद्योग उभारीस लागतील. इतकंच नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्‍या प्रशासकीय समस्या, प्रश्न मार्गी लागावेत म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ त्यांनी ‘पालकमंत्री कक्ष’ सुरू करून जनतेला सहज प्रवेश, त्वरित समस्या निराकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी ‘कोकण सन्मान २०२५’ सोहळा आयोजित करून सोशल माध्यमांतून कोकणच्या पर्यटनाचा जागर करणाऱ्या स्थानिक डिजिटल निर्माते, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आदींचा सन्मान घडवून आणला. तर कोकणच्या पर्यटन वृद्धीसाठी मैलाचा दगड ठरू शकेल, याकरिता एक पाऊल पुढे टाकत २०२६ मध्ये "झी सिने पुरस्कारांचे" यजमान पद स्वीकारताना सिंधुदुर्गमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी फार मोठा पुढाकार त्यांनी घेतलाय. पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्हा प्रशासनात आर्थिक व प्रशासनिक शिस्त आणून, सिंधुदुर्गमधील पर्यटन, आरोग्य, शिक्षण, बंदरे, मत्स्य व्यवसाय या क्षेत्रात तग धरून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर भर देत आपलं मार्गक्रमण सुरु ठेवलं आहे. आजच्या काळात आवश्यक असणारी व  सिंधुदुर्ग प्रशासनाला अधिक गतिमान व पारदर्शक करणारी AI प्रणाली राज्यात सर्वप्रथम जिल्‍ह्यात आणून त्यांनी आपला सिंधुदुर्ग जिल्हा वेगळ्या उंचीवर नेण्याचा निर्धार अधोरेखित केलाय.  कोकणसाठी गेली ३५ वर्ष अत्मियतेने काम करून सिंधुदुर्ग आणि कोकण संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविले ते राज्याचे अभ्यासू व यशस्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्‍याच मार्गदर्शनामुळे. किंबहुना त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नव्या उमेदीने आणि गतिमानतेने नव्या विकासाचे आश्वासन देणारे हे कणखर नेतृत्व नितेशजी राणे त्यांच्या कार्याने येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा अधिक समृद्ध करतील, यात शंका नाही. 

 कोकणचे कणखर नेते नारायण राणे यांचे मार्गदर्शन, भारतीय जनता पार्टीची खंबीर साथ, आणि पुन्हा एकदा कोकणी जनतेने विशेषतः सिंधुदुर्ग वासियांनी राणे कुटुंबियांवर दाखविलेले प्रेम निश्चितच नितेशजी कोकणच्या प्रश्नांवर विधिमंडळात आक्रमक भूमिका घेत आणि स्थानिक विकास, कोकण रक्षण, तसेच हिंदुत्ववादी विचारसरणी याची सांगड घालत कोकणचा राणे फॅक्टर महाराष्ट्रात अधोरेखित करतील, यासाठी सदिच्छा . 

संदिप देसाई

संपादक

दै.कोकणसाद - कोकणसाद LIVE