MUST READ | का वाढतेय तापमान?

अंतर्मुख करायला लावणारा खास लेख
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: April 24, 2023 08:10 AM
views 365  views

मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिबलो ) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे.


दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेल्या गव्हाबरोबर तिकडचे पार्थेनियम तण बी च्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि स्थानिक पर्यावरणात या तणाने हाहाकार माजवला. 


आपण त्याला गाजर गवत आणि काँग्रेस गवत म्हणतो, पण ह्याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही. कारण हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली. 


अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे. या झाडांच्या फुलात परागकण नाहीत, त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत. या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या झाडांच्या पानांनी आणि सावलीने आपल्या जमिनी निकृष्ट केलेल्या आहेत. 


या झाडांच्या फांद्यांचा, बुंध्यांचा उपयोग आपल्याला नाही. रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड अशा सर्रास दिसणाऱ्या पक्षांचा वावर दुर्मिळ झाला आहे. 


एकंदरीत अशा विदेशी झाडांवर होणाऱ्या परागकण प्रक्रियेला आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्गसाखळी / अन्नसाखळी कमकुवत होतेय. परदेशी झाडाची पाने, फुले, शेंगा आपल्याकडील गाय, बैल, शेळीसुद्धा खात नाहीत. 


माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की, परदेशी झाडे घातक आहे ते. आपल्याला अजून कळलेले नाही हेच मोठे दुर्देव. याचमुळे निसर्गाच्या अन्नसाखळीत एकमेकांवर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गाकडे ढकलले जात आहेत. या प्राणी, पक्षी आणि वनस्पतींवर उपजीविका करणारे माकड, वाघ, हत्ती, बिबटे, गवे हे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत.


ग्लिरिसिडीया सारख्या झाडाच्या फुलावरून उंदीर, घुशी गेल्या, तरी ते अपंग होतात, मरतात. या झाडाखालुन चालताना धाप लागते. या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जातो, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते. जवळपास ९०% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत. 


१९७० च्या दशकात युरोपियन देशांनी जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली, तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले, तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे. 


फायकस या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत. त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही. जिथे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत, तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे.


इतक्या मोठ्याप्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत. आणि त्यांना मुद्दाम नीलमोहोर, काशीद, सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत की, कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो. यासाठी ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत, ते झाड परदेशी समजावे. 


🔸आता देशी झाडेच का लावायची ? 


अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्। 


"अर्थात पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही." हे आपल्या पुराणात सांगून ठेवलेलं आहे.


वडाला, उंबराला देवाचा दर्जा दिला गेलाय. देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात. पक्ष्यांना, किडयांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो.


देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाचोळयातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढत असतो. विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत असतानाच खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात. विविध कीटकांना, किडयांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी उत्तम जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण करते. ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढते. ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता आपल्या देशी झाडामध्ये आहे. त्यांचे प्रमाण कमी झाल्याने अवकाळी पाउस, चुकलेले उन्हाळा, पावसाला, थंडी यांचे चक्र आपल्याला वेगाने विनाशाकडे घेवून जात आहे.


देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांचा निवारा बनतात. साधारणपणे ३५० पेक्षा जास्त जातीची झाडे वटवाघळं निसर्गात रोपण करीत असतात यात आंबा, जांभूळ, चिकू, बोर, उंबर, वड, पिप्रण, नांदरूक, मोहा, सीताफळ, रामफळ अशी अनेक फळझाडे असून सर्वात अगोदर फळ पिकते हे वटवाघळाला समजते. 


यात पाडाला पिकलेला आंबा सुरुवातीला वटवाघळे खातात आणि मग शेतकरी आंबे उतरवितो आणि मग आडी लावली जाते. मुक्या प्राण्यांना हे कळते मग माणसाला कधी कळणार ...? ? ?


पांगारा, सावर, सिताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस, आवळा, आंबा, कवठ, बेल, कडुनिंब, मोह, पळस ही झाडे न लावता निव्वळ फोटोसाठी चुकीचे वृक्षारोपण करणाऱ्या लोकांना थांबविणे गरजेचे आहे, अन्यथा हिरवळ दिसेल, मात्र जैवविविधता दिसणार नाही.

  - हर्षल वाघिरे 

 अध्यक्ष, श्री शिवकृष्णाई सेवा संस्था, PSK बीज & वृक्ष बँक, कडेगाव.