LIVE UPDATES

Gokulashtami 2026: जगातील एकमेव रहस्‍य...जिथे श्रीकृष्ण देवकीमातेच्या कडेवर

गोव्‍यात प्राणांची बाजी लावून भक्तांनी आक्रमकांपासून कसे वाचवले बाळकृष्णाला?
Edited by: स्‍वप्‍नील परब
Published on: September 04, 2026 13:13 PM
views 55  views

सिंधुदुर्ग : श्रीविष्णूंचे सहस्र नामावलीत गुंफलेले दशावतार जनमानसात सदैव वंदनीय ठरले आहेत; मात्र त्या अवतारांच्या मांदियाळीत श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या लीलांनी मानवी हृदयावर युगानुयुगे अढळ राज्य केले आहे. ब्रह्मांडाला श्रीमद्भगवद्गीतेचे अमोघ, अमूल्य आणि तत्वज्ञानाचे सर्वोच्च ज्ञान देणाऱ्या श्रीकृष्णाची मंदिरे विश्वाच्या कानाकोपऱ्यात, गल्लीबोळात उभी ठाकलेली दिसतात. कुठे तो बालगोपाळ म्हणून पूजला जातो, कुठे राधा-कृष्णाच्या प्रेमरूपात, तर कुठे विठ्ठल-रुक्मिणीच्या रूपात भक्तांना दर्शन देतो.

परंतु, या अथांग भारतवर्षात एक असे अद्वितीय आणि अलौकिक शक्तिपीठ आहे, जिथे बाळकृष्णाची पूजा त्याच्या जन्मदात्या देवकीमातेच्या कडेवर विराजमान असलेल्या रूपात केली जाते. गोव्याच्या भूमीवर वसलेले माशेल येथील श्री देवकी कृष्ण रवळनाथ मंदिर म्हणजे मातृवात्सल्याचा आणि पराकोटीच्या श्रद्धेचा एक अनुपम संगम आहे.

मंदिराचा इतिहास म्हणजे केवळ एका वास्तूची गाथा नसून तो आक्रमकांच्या छळाविरुद्ध स्थानिकांनी दिलेल्या अभूतपूर्व धर्मरक्षणाचा आणि संस्कृतीरक्षणाचा ज्वलंत संघर्षपट आहे. या मंदिराची मूळ स्थापना मांडवी नदीच्या विस्तीर्ण पात्रात असलेल्या चोडण या नयनरम्य बेटावरील गावात झाली होती. तथापि, सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला, इ.स. १५३० ते १५४० च्या कालखंडात गोव्यावर ताबा मिळवलेल्या पोर्तुगीज शासकांनी हिंदू संस्कृतीची प्रतीके आणि मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा धुमाकूळ घातला.

आपल्या आराध्य देवतेचे अस्तित्व आणि पावित्र्य अबाधित राहावे म्हणून स्थानिक भक्तांनी प्राणांची बाजी लावून ही अत्यंत पवित्र मूर्ती चोरून सुरक्षित जागी हलवली. १५४० ते १५६७ या विस्थापन काळात आक्रमकांच्या नजरेपासून दूर जात, उत्तर गोवा जिल्ह्यातील फोंडा तालुक्यातील माशेल या शांत व निसर्गरम्य गावात या मंदिराची पुनर्स्थापना करण्यात आली. सुरुवातीला अत्यंत लहान व साध्या रूपात उभारलेल्या या मंदिराचा पुढील काळात, म्हणजेच इ.स. १८४२ मध्ये भव्य आणि दिव्य जीर्णोद्धार करण्यात आला.

१५ व्या-१६ व्या शतकात पोर्तुगीज शासकांनी हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे सत्र सुरू केले. इ.स. १५३० ते १५४० च्या दरम्यान, या आक्रमणांपासून मूर्तीचे रक्षण करण्यासाठी स्थानिकांनी ही पवित्र मूर्ती गुपचूप सुरक्षित ठिकाणी हलवली. इ.स. १५४० ते १५६७ दरम्यान ही मूर्ती फोंडा तालुक्यातील माशेल (Marcel) या गावी आणून एका छोट्या रूपात मंदिराची स्थापना करण्यात आली. पुढे इ.स. १८४२ मध्ये या मंदिराचा भव्य जीर्णोद्धार करण्यात आला, ज्याने आजच्या वास्तूचे रूप घेतले.

गोव्यात माशेल येथे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर कलात्मकदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या गर्भगृहाचे दर्शन होताच मन आपोआप लीन होते. काळ्या सुरेख पाषाणात साकारलेल्या मुख्य मूर्तीत देवकीमाता उभी असून तिच्या डाव्या कडेवर बाळकृष्ण अत्यंत गोंडस व मनमोहक रूपात विराजमान आहे. आईच्या डोळ्यांतील वात्सल्य आणि बाळाच्या चेहऱ्यावरील गोजिरवाणे हास्य यांचे हे पाषाणातील शिल्प म्हणजे कला आणि भक्तीचा परमोच्च बिंदू आहे.

संपूर्ण भारतात अशा प्रकारचे मातृ-बालकाचे पूजन होणारे हे एकमेव स्थान मानले जाते. या मुख्य मूर्तीसोबतच मंदिर परिसरात लक्ष्मी रवळनाथ, भौमिका देवी, कात्यायणी यांसारख्या परिवार देवताही भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अधिष्ठित आहेत. अध्यात्म आणि संस्कृतीचा मिलाफ असलेला या मंदिराचा वार्षिक जत्रौत्सव आणि नवरात्रौत्सव मोठ्या थाटामाटात, धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या लखलखाटात साजरा केला जातो. एका बाजूला पोर्तुगीज आक्रमकांच्या तावडीतून जपलेला इतिहास आणि दुसऱ्या बाजूला देवकी-कृष्णाचे चिरंतन वात्सल्य, यांमुळे हे मंदिर केवळ गोव्याचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे एक अनमोल सांस्कृतिक रत्न ठरले आहे.

लेखक : स्‍वप्‍नील परब