कोमल हृदयाचा कार्यसम्राट

नितेश राणे वाढदिवस विशेष
Edited by:
Published on: June 23, 2025 13:22 PM
views 17  views

दयावान कोमल हृदयाचा कार्यसम्राट असा मंत्री म्हणजे नितेशजी राणे होय. नितेश राणे साहेब यांचे नाव घेतले की लगेचच कर्मचारी, अधिकारी वर्गाला धडकी भरते. एक आक्रमक चेहरा जनतेच्या हितासाठी, जनतेच्या प्रश्नांसाठी, गोरगरीबांच्या हितासाठी वाटेल ते करण्याची ज्यांची तयारी असते.  होणार्‍या परिणामांची अजिबात तमा न बाळगणारा नेता म्हणजे नितेशजी राणे!

 होय.... माझे आणि नितेशजी राणे साहेब आमचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि भाऊबंधकीचे झाले आहे. मी १२ ऑक्टोबर २०२२ कणकवली येथे कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नतीने हजर झालो. मला घरातील मंडळी सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी सगळे सांगत होते, अरे अजय कणकवली येथे जाऊ नकोस त्या ठिकाणचे आमदार खूप आक्रमक आहेत, विनाकारण तुला त्रास होईल, तुझी भरपूर सेवा निष्कलंकपणे झाली आहे, एक तर तू बदली करून घे किंवा राजीनामा दे, असे सांगत होती जर आपण राजीनामा दिला किंवा बदली करून घेतली तर आपण भ्याड ठरू, म्हणून मी ठरवले की काहीही झाले तरी शेवटची टर्म पूर्ण करायची आणि कणकवली विभागाचा कायापालट करायचा, असा मनाचा दृढनिश्चय केला. मी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी कणकवली येथे कार्यकारी अभियंता म्हणून हजर झालो. साधारणत: २५ ऑक्टोबर २०२२ रोजी नितेश राणे साहेब यांना आमदार या नात्याने भेटण्यासाठी गेलो, माझ्याबरोबर माझे एक सहकारी होते. मला पहिल्याच भेटीत आमदार नितेश राणे यांनी सांगितले. सर्वगोडजी आमचे भरपूर उद्योगधंदे आहेत, आम्ही उद्योगधंद्यातील कमाईमधील पैसे राजकारणात ओततो. आम्हा राणे कुटुंबाला सिंधुदुर्ग वासियांनी भरपूर काही दिले आहे, आता फक्त आम्हांला विकासाचा गाडा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निरंतर सुरु ठेवायचा आहे. त्यासाठी तुम्ही योगदान द्या, माझ्या मतदारसंघातील रस्ते दर्जेदार असले पाहिजेत, तुम्ही कामाच्या गुणवत्तेत अजिबात तडजोड करू नका, असे ठणकावून मला सांगितले. त्याचक्षणी जाणवले अरे हा तर विकास पुरुष आहे मग विनाकारण यांना बदनाम करतात याची मला जाणीव झाली. 

दिवाळी सुरु होणार होती म्हणून मी बंगल्यावर जाताना जवळपास पाच किलोचे मिठाईचे बॉक्स घेऊन गेलो होतो, मिठाईचे बॉक्स पाहता नितेश राणे भडकले सर्वगोडजी तुम्ही यापुढे आमच्या बंगल्यावर येताना काहीही घेऊन यायचे नाही. आमच्या वडिलांनी आम्हांला चांगली शिकवण दिली आहे. कर्मचारी, अधिकारी वर्गाचा चहा सुद्धा घेऊ नये, असा आदर्श आम्हांला घालून दिला आहे, तोच आदर्श घेऊन आम्ही पुढे जात आहोत, हे ऐकून मी खूप भारावून गेलो. माझ्या मनात नितेश राणे  आणि त्यांचे वडिल माजी मुख्यमंत्री सध्याचे विद्यमान खासदार नारायण राणे साहेब यांच्या बद्दल प्रचंड आदर वाढला. मी ठरवले अरे हे राणे कुटुंब अगदी जगावेगळे आहे. राणेंची खासियत औरच आहे, यात काही शंका नाही त्यामुळे त्याच क्षणी ठरवले या कुटुंबासाठी आणि या जिल्ह्यासाठी मरेपर्यंत कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करायची. मी जवळपास अडीच वर्षे कार्यकारी अभियंता म्हणून त्यांच्या मतदारसंघात काम केले. या मतदारसंघात मी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून नितेश साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड काम केले. यासाठी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी निधी देण्यासाठी मोलाची साथ मला आणि नितेश राणे यांना दिली. नितेश राणे यांच्याकडून प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकीचे यथार्थ मला दर्शन झाले. 


मी त्यांच्या सहवासात भारावून गेलो. माझ्या मुलाचा विवाह सोहळा १९ नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे येथे संपन्न झाला. मी मुलाच्या लग्नाची पत्रिका नितेशजी राणे साहेब यांच्या बंगल्यावर घेऊन गेलो असता पत्रिका दिल्यानंतर राणे साहेब मला बोलले, सर्वगोडजी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी आणि कितीही महत्वाचे काम असले तरी तुमच्या मुलाच्या लग्नाला पुणे येथे येणार. मला क्षणभर थोडेसे आश्चर्य वाटले कारण नितेश राणे साहेब यांच्यावर पक्षाने तेलंगणा निवडणुकीची जबाबदारी दिली होती आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमधून माझ्या मुलाच्या लग्नाला ते येतील, अशी सुताराम शक्यता नव्हती. मी स्मितहास्य केले आणि त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडलो, बाहेर पडत असताना नितेश राणे बोलले, सर्वगोडजी मला माहित आहे तुम्ही भ्रष्‍ट अधिकारी नाही आहात. तुम्ही कोणाचाही एक रुपया घेत नाहीत, पुणे येथे लग्न करणे तुम्हाला खूप महागात पडणार आहे याची मला कल्पना आहे. त्‍यामुळे आपल्‍याला लागेल ती मदत करू, असे म्‍हणत त्‍यांनी आपुलकीचा आधार दिला. त्‍यांचे हे  उद्‍गार ऐकताच माझे मन भरून आले. डोळे किंचितसे पाणावले. मला थोडे आश्चर्य सुद्धा वाटले आणि त्याच क्षणी जाणवलं की हा महान नेता खरा कोकणी माणूस आहे कोकणी माणूस फणसासारखा असतो वरून न टोचणाऱ्या काट्यासारखा आणि आतून मधुर आणि गोड गरे असणारा अत्यंत कोमल हृदयाचा इतरांबद्दल प्रेम, जिव्हाळा आपुलकी जपणारा हा नेता होय! 

लग्नाच्या दिवशी सकाळी दहा वाजता मी साहेबांच्या बंगल्यावर फोन केला नितेश राणे साहेब दहा वाजता तेलंगणामध्ये आहेत, असे समजले हे ऐकून माझे मन जरा खिन्न आणि दुःखी झाले आणि माझी खात्री पटली ते माझ्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीत. लग्न समारंभ दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी आठ वाजता पार पडत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चक्क राणे साहेब साडेसात वाजता लग्न सोहळ्यासाठी उपस्थित झाले. मी आणि माझे कुटुंब मित्र परिवार आणि उपस्थित मान्यवर त्यांना पाहून भारावून गेलो. लग्न समारंभासाठी आलेले सर्वलोक सुद्धा अचंबित झाले. महाराष्ट्राचा दबंग नेता आक्रमक नेता तेलंगणाहून खाजगी विमानाने एवढा मोठा खर्च करून एका अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न समारंभाला उपस्थित झाला. कामापलीकडे व्यक्तिगत नाते जपणारा, प्रेम,  जिव्हाळा देणारा नेता म्हणजे नितेशजी राणे होय! असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मला राणे साहेबांचे खरोखर कौतुक वाटते आणि त्यांचा मला सार्थ अभिमान सुद्धा आहे. सिंधुदुर्ग जिल्हामध्ये एक दुर्दैवी घटना घडली या घटनेचा आमच्या विभागाशी काडीचा संबंध नसताना केवळ विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सा. बां. विभागाला आणि राज्य सरकारला  बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले होते. यामध्ये मला अगदी मोलाची खंबीर साथ नितेश राणे साहेब यांनी दिली. हे त्यांचे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. आज या महान नेत्याचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे.

अजयकुमार सीताराम सर्वगोड 

सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, 

सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली