LIVE UPDATES

सिंधुदुर्गात ७३१ जणांच्या खिशात पिस्तूल

'आत्मसंरक्षण' की स्टेटस सिम्बॉल?
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 20, 2026 17:24 PM
views 389  views

  •  जिल्ह्यात २,८०६ शस्त्र परवानाधारक

सिंधुदुर्गनगरी : "स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र" हा मूळ उद्देश असला तरी आता पिस्तूल बाळगणे हे अनेकांसाठी प्रतिष्ठेचे प्रतीक बनत चालल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्या तब्बल २,८०६ नागरिकांकडे शस्त्र परवाने असून त्यापैकी ७३१ जणांकडे आत्मसंरक्षणासाठी पिस्तूल अथवा अन्य शस्त्रे बाळगण्याची परवानगी आहे. त्यामुळे "आत्मसंरक्षण की स्टेटस सिम्बॉल?" असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाढती गुन्हेगारी, व्यावसायिक स्पर्धा, राजकीय वैमनस्य किंवा वैयक्तिक वाद यांमुळे अनेक जण जीवितास धोका असल्याचे कारण देत शस्त्र परवान्यासाठी अर्ज करतात. मात्र प्रत्यक्षात समाजात रुबाब दाखवण्यासाठी आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगण्याचा मोह अनेकांना होत असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक शस्त्र परवाने हे शेती संरक्षणासाठी देण्यात आलेले आहेत. वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी अनेक शेतकरी कायदेशीररीत्या बंदुका बाळगतात. तरीही आत्मसंरक्षणाच्या नावाखाली शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

दरवर्षी शेकडो अर्ज

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दरवर्षी शस्त्र परवान्यासाठी शेकडो नवीन अर्ज दाखल होतात. यामध्ये व्यावसायिक, उद्योजक, राजकीय कार्यकर्ते तसेच तरुणांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. प्रत्येक अर्जाची पोलीस यंत्रणेमार्फत सखोल पडताळणी केली जाते. अर्जदाराची पार्श्वभूमी, गुन्हेगारी नोंदी, मानसिक व शारीरिक क्षमता यांची तपासणी झाल्यानंतरच परवाना मंजूर केला जातो.

परवाना मिळवणे सोपे नाही !

शस्त्र परवान्यासाठी कडक नियमांचे पालन करावे लागते. पोलिसांचा अहवाल, वैद्यकीय प्रमाणपत्रे, शस्त्र हाताळणीची जबाबदारी आणि विविध प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. याशिवाय शस्त्र खरेदीचा खर्चही लाखांच्या घरात जात असल्याने हा छंद सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा मानला जातो.

परवाना रद्दही होऊ शकतो

गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग, शांततेला धोका निर्माण करणे, निवडणुकीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणे किंवा शस्त्राचा गैरवापर केल्याचे आढळल्यास प्रशासन परवाना थेट रद्द करू शकते. निवडणुकीच्या काळात परवानाधारकांना शस्त्रे पोलिसांकडे जमा करणे बंधनकारक असते.

सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शनास मनाई

परवानाधारक शस्त्र केवळ आत्मसंरक्षणासाठी वापरण्याची मुभा असते. सार्वजनिक ठिकाणी पिस्तूल मिरवणे, धाकदपटशा करणे किंवा शस्त्राचे प्रदर्शन करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

अवैध शस्त्रांचा वाढता धोका

कायदेशीर परवाना न मिळाल्यानंतर काही जण उत्तर भारतातून अवैध गावठी कट्टे किंवा बेकायदेशीर पिस्तुले खरेदी करत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळत असते. त्यामुळे अशा अवैध शस्त्रांच्या विरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जाते.


जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांची स्थिती
▶ एकूण शस्त्र परवानाधारक : २,८०६
▶ आत्मसंरक्षण परवाने : ७३१
▶ शेती संरक्षणासाठी परवाने : सर्वाधिक
▶ दरवर्षी नवीन अर्ज : शेकडो

"सुरक्षेपेक्षा प्रतिष्ठेसाठी शस्त्र बाळगण्याची वाढती मानसिकता ही चिंतेची बाब ठरत असून, शस्त्र परवाना म्हणजे जबाबदारीची जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे," असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.