
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. पर्यटनासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांच्या गटातील पाच जण समुद्रात बुडाल्याची घटना घडली असून त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आला होता. सकाळच्या सुमारास काही पर्यटक समुद्रात उतरले असता अचानक वाढलेल्या लाटांचा आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाच जण खोल पाण्याकडे वाहून गेले. काही क्षणांतच ते नजरेआड झाल्याने किनाऱ्यावर एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, जीवरक्षक आणि व्यावसायिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. समुद्रातील वेगवान प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्याला अडथळे येत असले तरी बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
घटनास्थळी पोलीस व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.










