
मुंबई : महाराष्ट्र राज्यात 30 हजार 209 शिक्षक पदांची भरती शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील डी.एड आणि बी.एड मध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना शिक्षक होण्याची ही संधी आहे. पवित्र पोर्टलद्वारे ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील 1 ली ते 12 वीसाठी ही पदांची भरती करण्यात येणार आहे.
30 हजार 209 रिक्त पदांची भरती
स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील 1 ली ते 5 वी करिता 14 हजार 320 पदे, इयत्ता 6 वी ते 8 वी साठी 10 हजार 12 पदे, इयत्ता 9 वी ते 10 वी करिता 5 हजार 513 पदे, इयत्ता 11 वी ते 12 वी करिता 364 पदांची भरती करण्यात येणार आहे. यातील 19 हजार 881 पदांसाठी गुणवत्ता व नियमानुसार थेट नियुक्ती करण्यात येणार आहे. तर 10 हजार 328 पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण 30 हजार 209 रिक्त पदांमध्ये जिल्हा परिषदांच्या 13 हजार 352 महानगर पालिकेच्या 1 हजार 954, नगर पालिका तसेच परिषदेच्या 280 व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 12 हजार 148 अशा एकूण 30 हजार 209 रिक्त पदांच्या भरती पवित्र पोर्टलवरील जाहिरात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राबविण्यात येणार आहे
'या' तारखेपर्यंत पसंतीक्रम नोंदवणे
इच्छूक उमेदवारांना 6 ऑगस्ट 2026 ते 11 ऑगस्ट 2026 पर्यंत पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो अंतिम स्वरुपात लॉक करण्याचे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. एकदा पसंतीक्रम लॉक केल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही. उमेदवारांना https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या वेबसाईवर जावून प्राधान्यक्रम निश्चित करावा लागणार आहे. यानंतर थेट नियुक्ती करण्यात येणाऱ्या पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल असे शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी सांगितले.














