LIVE UPDATES

पावसाळ्यात डासांना रोखण्यासाठी हे करा

वैद्यकीय अधिक्षकांच्या सूचना
Edited by: विनायक गांवस
Published on: June 19, 2025 13:10 PM
views 373  views

सावंतवाडी : कीटकजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी गटारे, डबकी वाहती करावीत. खड्डे बुजवावेत. घराभोवती कोणत्याही वस्तूमध्ये पाणी साचू देऊ नये असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले आहे. 

ते म्हणाले, पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढून कीटकजन्य रोगांचा फैलाव वाढतो. डासामुळे मलेरिया (हिवताप), डेंग्यू, चिकूनगुन्या, हत्तीरोग यासारख्या तापजन्य आजारांचा प्रसार होतो. पावसाळ्यात पाणीसाठे वाढतात. या पाणीसाठ्यात डास अंडी घालतात. २ ते ३ दिवसात अंड्यातून अळी बाहेर येते. त्यापुढील ३ ते ४ दिवसांनी कोष तयार होऊन पुढील २ दिवसात कोष फोडून डास बाहेर पडतो. म्हणजेच सर्वसाधारणपणे ८ ते १२ दिवसात डासांची उत्पत्ती होत राहते. साचलेल्या पाण्यात ऑईल टाकावे अथवा मासे सोडावेत. शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, म्हणजेच पाणी साठवणुकीची सर्व भांडी रिकामी करून घासून पुसून, कोरडी करावीत. यामुळे डासांची अंडी नष्ट होतील.

घराच्या खिडक्यांना जाळी बसवावी. मच्छरदाणीचा वापर करावा. डास प्रतिबंधक तेल/क्रीम वापरावे. थंडी-ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, स्रायुदुखी, डोळ्यांच्या आतील भागात दुखणे, उलटी, जुलाब, अंगावर पुरळ, हिरड्यातून रक्त येणे यापैकी लक्षणे दिसल्यास त्वरित उप जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले आहे.