तुम्हीही रात्री 9 नंतर जेवता ? सावधान

Edited by: जुईली पांगम
Published on: December 05, 2022 13:08 PM
views 242  views

रात्रीच्या जेवणाचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. व्यस्त लाईफस्टाईल किंवा रात्री उशीरापर्यंत काम करत राहिल्यामुळे अनेक लोक रात्रीचे जेवण उशीरा घेतात. तर काही लोक असेही असतात, ज्यांना रात्रीचे जेवण उशीराच जेवायची सवय असते. मात्र उशीरा जेवण्याची ही सवय अतिशय हानिकारक ठरू शकते. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल आणि रात्री उशीरा जेवत असाल , तर या वाईट सवयीमुळे तुम्ही आजारी पडू शकता. खरंतर रात्री उशीरा जेवल्यामुळे अन्न लवकरच पचत नाही, ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. रात्री उशिरा जेवणाचे नेमक काय दुष्परिणाम आहेत ते पाहूयात.


NCBIच्या एका संशोधनानुसार रात्री 9 नंतर जेवणे हे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. कारण रात्रीचे जेवण आणि झोप याच्यामध्ये किमान 2 तासांचे अंतर असणे गरजेचे असते. मात्र उशीरा जेवल्यानंतर लोक लगेच झोपायला जातात आणि त्यामुळे अन्न नीट पचत नाही, शरीराचे मेटाबॉलिज्म संथ गतीने काम करते. यामुळे शरीर अनेक आजारांना निमंत्रण देते.

रात्री उशीरा जेवल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅसेस, हाय ब्लड शुगर, लठ्ठपणा आणि हृदय रोग यासारखे अनेक धोके उद्भवू शकतात. रात्री 6 ते 8 या वेळेत जेवणे उत्तम असते, असे बहुतांश अभ्यासांमध्ये आढळले आहे. रात्री उशीरा जेवल्यामुळे काय त्रास अथवा आजार होऊ शकतो, जाणून घेऊया.

पचनासंबंधी समस्या

रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीचा सर्वाधिक परिणाम हा आपल्या पचनशक्तीवर होतो. खरं तर रात्रीच्या जेवणानंतर कोणतीही शारीरिक हालचाल होत नाही आणि आपण थेट झोपायला जातो. यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही. ज्यामुळे ॲसिडिटी, ब्लोटिंग इत्यादी समस्या उद्भवू शकतात. याशिवाय पोटाचे इतरही अनेक विकार होऊ लागतात.

वजन वाढू शकते

रात्री उशिरा जेवल्यामुळे वजन वाढण्याची समस्या खूप सामान्य आहे. खरंतर वेळेवर न खाल्ल्याने शरीराचे मेटाबॉलिज्म (चयापचय क्रिया) मंदावते. ज्यामुळे अन्नातून घेतलेल्या कॅलरीज नीटबर्न होत नाहीत आणि शरीरातील चरबी वाढू लागते. आरोग्य तज्ञांच्या मते, रात्री जेवल्यानंतर क्रियाशीलता नसते,त्यामुळे जेवण आणि झोप यात दोन तासांचे अंतर आवश्यक आहे.

रक्तदाब

एका संशोधनाच्या अहवालानुसार, रात्री सतत उशिरा जेवण्याची सवय असेल तर ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज हे आजार होण्याचा धोका वाढतो. उशिरा जेवल्याने वजन वाढतं, त्यामुळे रक्तातील साखर अनियंत्रित होते. आणि नंतर यामुळे हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या उद्भवतात.

अपुरी झोप

रात्री उशिरा जेवण्याची सवय असेल तर निद्रानाशाची समस्याही उद्भवू शकते. अनेकदा लोक तक्रार करतात, की त्यांना रात्री लवकर झोप येत नाही. त्याचे मूळ कारण म्हणजे उशिरा जेणे. आपले शरीर उशिरा जेवलेले अन्न योग्य प्रकारे पचवू शकत नाही, ज्यामुळे आपली झोप कमी होऊ शकते.

एनर्जी लेव्हल कमी होते

रात्री उशिरा खाल्ल्याने दुसऱ्या दिवशी बद्धकोष्ठता, डोकेदुखी आणि इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच योग्यरित्या पचन न झाल्यामुळे शरीराला आवश्यक ती पोषकद्रव्ये मिळत नाहीत व एनर्जी लेव्हल कमी राहते. अशा परिस्थितीत तुमचा संपूर्ण दिवस वाया जाऊ शकतो.

मेंदूसाठी हानिकारक

रात्री उशिरा जेवल्याने होणारा परिणामही आपल्या मेंदूसाठी खूप हानिकारक ठरू शकतो. रात्री झोप न लागणे आणि पोटाशी संबंधित इतर अनेक समस्यांमुळे दुसऱ्या दिवशी एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. रात्रीच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थ जास्त खाणे चांगले असते. त्यामुळे तुम्हीही रात्री उशिरा जेवणाची चूक करत असाल तर आतच सुधारा...नाही तर तुमच्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतील