
नवी दिल्ली : गौरव खन्ना 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून बाहेर पडला आहे. या प्रवासादरम्यान गौरवने अनेक धोकादायक स्टंट्स केले आणि त्याला अनेकदा दुखापतींचाही सामना करावा लागला. मात्र, एका दुखापतीचे स्वरूप इतके गंभीर होते की त्याला शो सोडावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीच्या 'खतरो के खिलाडी १५' या शोमध्ये एका 'एलिमिनेशन स्टंट' दरम्यान त्याच्या कोपराला दुखापत झाली. तीव्र वेदनेमुळे त्याला तो टास्क अर्धवट सोडावा लागला. त्यानंतर, एलिमिनेशन फेरीत त्याचा सामना रुबिना दिलैक आणि शगुन शर्मा यांच्याशी झाला आणि अखेरीस तो स्पर्धेतून बाहेर पडला.
'खतरो के खिलाडी १५' मधील एलिमिनेशन टास्कमध्ये रुबिना, शगुन आणि गौरव यांना दोन लहान पुलांच्या दरम्यान उड्या मारून विविध रंगांचे झेंडे गोळा करायचे होते. शगुनने सहा, तर रुबिनाने पाच झेंडे गोळा केले. गौरवने मोठ्या उत्साहाने टास्कला सुरुवात केली, पण अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट पाण्यात पडला. पाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या कोपराला दुखापत झाली आणि त्याला तीव्र वेदना झाल्या. त्याला आधीच ही दुखापत झाली होती, या स्टंटदरम्यान ही दुखापत अधिक बळावली. अखेरीस, अंतिम निर्णयानुसार गौरव खन्नाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
स्पर्धेतून बाहेर पडताना गौरवने सांगितले की, या प्रवासादरम्यान त्याचे फरहाना भट, हर्ष गुजराल आणि ओरी यांच्याशी घट्ट नाते निर्माण झाले होते. त्याच्या बाहेर पडण्यामुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत. शोमधून बाहेर पडताना गौरव भावूक झालेला दिसला.














