भारतासोबत दोन कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघाची घोषणा

Edited by:
Published on: September 17, 2025 14:13 PM
views 11  views

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका पुढील महिन्यापासून रंगणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) चक्रातील असल्यामुळे तिचे महत्त्व अधिक आहे. पहिला सामना 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तर दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

वेस्टइंडीज संघाने मालिकेपूर्वीच आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघाची धुरा रोस्टन चेजकडे सोपवण्यात आली असून, उपकर्णधाराची जबाबदारी जोमेल वारिकनकडे दिली आहे. यावेळी काही नवीन आणि तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

संघात शिवनारायण चंद्रपॉल यांचा मुलगा तेगनरायण चंद्रपॉल, एलिक अथानाजे आणि फिरकीपटू खैरी पियरे यांना स्थान मिळाले आहे. भारतातील खेळपट्टींचा विचार करून ही निवड करण्यात आली असल्याचे वेस्टइंडीज क्रिकेट संचालक माइल्स बास्कोम्ब यांनी सांगितले. त्यांच्या मते, भारताच्या घरच्या मैदानावर खेळताना संघाला दमदार आव्हान उभे करता येईल, अशी निवड करण्यात आली आहे.

वेस्टइंडीज संघ 22 सप्टेंबरला आपल्या देशातून भारतासाठी रवाना होणार असून 24 सप्टेंबरला थेट अहमदाबादमध्ये दाखल होईल. यावेळी वेस्टइंडीजचा संघ 2018 नंतर प्रथमच भारतात कसोटी मालिका खेळण्यासाठी येत आहे.

वेस्टइंडीज संघ: रोस्टन चेज (कर्णधार), जोमेल वारिकन (उपकर्णधार), केवलन अँडरसन, एलिक अथानाजे, जॉन कॅम्पबेल, तेगनरायण चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्स, शाई होप, टेविन इमलाच, अल्जारी जोसेफ, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खैरी पियरे, जेडन सील्स.