इंग्लंड कसोटीत पहिला दिवस भारताने गावजला

यशस्वी जयस्वाल, शुभमन गिलची शतके | रिषभ पंतची अर्धशतकीय खेळी
Edited by: ब्‍युरो
Published on: June 21, 2025 11:20 AM
views 17  views

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हेडिंग्ले मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी जोरदार कामगिरी केली. युवा यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांनी शतके झळकावली. रिषभ पंतने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे मन जिंकले. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने 3 विकेट गमावून 359 धावा केल्या.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भारताने 300 पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी भारतीय संघाला असे करता आले नव्हते. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भारताने 300 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. पण इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच असा पराक्रम करण्यात यश आले आहे. सलामी जोडीने 91 धावांची भागीदारी केली.


भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. राहुल 42 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पदार्पण करणारा साई सुदर्शन कोणताही जादू दाखवू शकला नाही त्याने खातेही उघडू शकला नाही. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार शुबमन गिलने जयस्वालसोबत मोठी भागीदारी केली. या दोन्ही खेळाडूंसमोर इंग्लिश गोलंदाज निष्प्रभ ठरले.

यशस्वी जयस्वालने प्रथम 101 धावांची खेळी केली. त्याला बेन स्टोक्सने क्लीन बोल्ड केला. शुबमन गिलने नाबाद 127 धावांचे योगदान दिले. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत 65 धावा करून अजूनही खेळत आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांना काही खास दाखवता आले नाही. स्टोक्सने दोन विकेट घेतल्या. तर ब्रायडन कार्सने एक विकेट घेतली.