Ind Vs Eng Test : भारत 96 धावांनी आघाडीवर

Edited by: ब्‍युरो
Published on: June 23, 2025 12:31 PM
views 6  views

लीडस् : जसप्रीतचा भेदक मारा आणि के.एल. राहुलच्या संयमी 47 धावांच्या खेळीमुळे भारताने येथील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर नियंत्रण ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रविवारी तिसर्‍या दिवसअखेरीस 2 बाद 90 धावांसह भारतीय संघ या लढतीत 96 धावांनी आघाडीवर राहिला असून आता सोमवारी चौथ्या दिवसाच्या खेळात ही आघाडी मजल-दरमजल प्रवासात आणखी भक्कम करण्यात भारत यशस्वी ठरणार की इंग्लंडचा संघ भारताच्या बचावाला भगदाड पाडण्यात यशस्वी ठरणार, याची आज उत्सुकता असेल. एकंदरीत हेडिंग्लेचा हा रणसंग्राम आता निर्णायक वळणावर पोहोचतो आहे!

हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या या चुरशीच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या तिसर्‍या दिवशी जसप्रीत बुमराहच्या भेदक मार्‍यानंतर के. एल. राहुलच्या संयमी 47 धावांच्या नाबाद खेळीमुळे भारताने इंग्लंडवर नियंत्रण ठेवले. इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपताच भारताला सहा धावांची आघाडी मिळाली होती. दिवसाचा खेळ पावसामुळे अर्धा तास आधी थांबवण्यात आला, तेव्हा भारताने दुसर्‍या डावात 2 बाद 90 धावा केल्या होत्या आणि 96 धावांची आघाडी घेतली होती.

भारताकडून जसप्रीत बुमराहने 83 धावांत 5 बळी घेतले. ही त्याची कसोटीतील 14 वी पाच बळींची कामगिरी असून परदेशातली 12 वी ‘फायव्हर’ आहे. त्याने या प्रकारात कपिल देवच्या विक्रमाची बरोबरी केली. प्रसिद्ध कृष्णाने तीन तर मोहम्मद सिराजने दोन गडी बाद केले. भारताच्या दुसर्‍या डावात यशस्वी जैस्वाल अवघ्या 4 धावांवर बाद झाला. त्याला बायडन कार्सने बाद केले. त्यानंतर के. एल. राहुल आणि साई सुदर्शन यांनी दुसर्‍या विकेटसाठी 66 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत डाव सावरला. साई सुदर्शनला पुन्हा एकदा स्टोक्सने तंबूत पाठवले. दिवसअखेर राहुल 47 धावांवर नाबाद असून, शुभमन गिल 6 धावांवर त्याच्या साथीला आहे.