कर्णधार बदलला पण पराभवाचेच पाढे, भारताचा पहिल्या कसोटीत दमदार पराभव

Edited by:
Published on: June 25, 2025 18:20 PM
views 13  views

लंडन: भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांना विजयाची समान संधी होती. पण भारताने पाचव्या दिवशीही त्याच चुका केल्या आणि विजयाची संधी गमावली. भारताने पाचव्या दिवशीही झेल सोडण्यात सातत्य दाखवले आणि त्यामुळेच त्यांना पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने पाचव्या दिवसाची संयतपणे सुरुवात केली आणि विजयाचा पाया रचला. भारताचे गोलंदाज बळी मिळवण्यात सुरुवातीला अपयशी ठरले आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा भारताने झेल सोडले, हा भारताच्या पराभवाचा परीपाक ठरला. इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स राखून विजय साकारला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताने इंग्लंडला विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान विजयासाठी दिले होते. भारताने चौथ्या दिवशी बिन बाद २१ अशा धावा केल्या होत्या, त्यामुळे त्यांना पाचव्या दिवशी ३५० धावा करायच्या होत्या. इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्राऊली यांनी भारताच्या गोलंदाजांना विजयापासून दूर ठेवले. या दोघांनी तब्बल १८८ धावांची सलामी दिली आणि इंग्लंडच्या विजयाचा भक्कम पाया रचला. झॅक ६५ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. पण त्यानंतरही बेन डकेट भारताच्या गोलंदाजीचा समाचार घेत होता. भारताने त्यानंतर ऑली पोपला ८ धावांवर बाद केले. पण डकेट मात्र धावांची गती चांगलीच वाढवत होता.

बेन डकेटने शतक झळकावले आणि तो दीडशतकाच्या दिशेने कूच करत होता. डकेटला दीड शतकासाठी फक्त एकच धाव हवी होती. पण त्याचवेळी त्याला शार्दुल ठाकूरने बाद केले आणि इंग्लंडला मोठा धक्का दिला. पण डकेट आपलं काम करून गेला होता. डकेटने यावेळी २१ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १४९ धावांची सर्वोत्तम खेळी साकारली. डकेट बाद झाल्यावर हॅरी ब्रुक्सला शून्यावर बाद करत शार्दुल ठाकूरने रंगत आणली होती. पण त्यानंतर जो रुट आणि बेन स्टोक्स या अनुभवी खेळाडूंनी इंग्लंडचा डाव सावरला आणि त्यांना विजयाच्या दिशेने घेऊन गेले. भारताला या सामन्यात सर्वात मोठे धक्के बसले ते झेल सोडल्यामुळे. कारण इंग्लंडच्या दोन्ही डावात भारताच्या खेळाडूंनी झेल सोडण्याची शर्यतच लावली होती आणि त्यामुळेच इंग्लंडला हा सामना जिंकता आला.