
नवी दिल्ली : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोज जनता पार्टी गेल्या ३६ दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करत होती. धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आणि त्यामागील कारणे स्पष्ट केली.
प्रधान यांनी आपल्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, चार दशकांहून अधिक काळ ते विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित आहेत. त्यांचा नेहमीच विश्वास राहिला आहे की, एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे, "३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट-यूजी (NEET-UG) परीक्षेतील अनियमिततेच्या तक्रारी प्राप्त होताच सरकारने तात्काळ कारवाई केली. तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला, परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पुढील वर्षापासून नीट परीक्षा पूर्णपणे संगणक-आधारित (CBT) पद्धतीने घेतली जाईल, अशी घोषणा करण्यात आली."
धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिले की, २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी परीक्षा निष्पक्ष आणि सुरळीतपणे घेणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य होते. केंद्र सरकार, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासने, विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याने २१ जून २०२६ रोजी फेरपरीक्षा यशस्वीरित्या पार पडली. १६ जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये गरीब आणि वंचित कुटुंबांतील अनेक गुणवंत विद्यार्थी यशस्वी झाले, परंतु जबाबदार पदांवरील काही लोकांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे खूप दुःख झाले.














