LIVE UPDATES

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक | 11 पोलिस कर्मचारी सस्पेन्ड !

8 पोलीस कर्मचारी आणि 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 11, 2022 10:41 AM
views 557  views

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शनिवारी संध्याकाळी पिंपरी-चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याने शाई फेकली होती. पोलिसांची सुरक्षा भेदून समता दलाचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी थेट पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता गृहमंत्रालयाकडून त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शाईफेक प्रकरणात ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये ८ पोलीस कर्मचारी आणि तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. याप्रकरणी आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी काहीवेळातच प्रसारमाध्यमांसमोर येत आक्रमकपणे प्रतिक्रिया दिली होती. माझ्यावर असे भ्याड हल्ले झाले तरी मी घाबरणार नाही. विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासमोर येऊ दाखवावे, असे चंद्रकांत पाटील यांनी त्वेषाने सांगितले होते. चंद्रकांत पाटील हे शनिवारी मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते. या कार्यक्रमाला जायच्या आधी ते कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरातून निघताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. ही शाईफेक झाल्यानंतर शाई फेकणाऱ्यांनी 'निषेध असो, निषेध असो', 'चंद्रकांत पाटील यांचा धिक्कार असो', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा विजय असो', 'महात्मा फुले यांचा विजय असो',अशा घोषणा दिल्या होत्या.\


चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र भाजपमधील वजनदार नेत्यांपैकी एक आहेत. ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. आता ते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याभोवती नेहमीच कडेकोट सुरक्षा असते. मात्री, ही सुरक्षा भेदून समता दलाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याने एकच खळबळ उडाली होती. एवढी सुरक्षा असूनही चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत समता दलाचे कार्यकर्ते पोहोचलेच कसे, असा सवाल विचारला जात आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्यात पोलिसांचा कोणताही दोष नसल्याचे सांगितले होते.


पोलिसांना दोष देण्याचं काही कारण नाही. मी पोलिसांना दोष देणार नाही. पोलिसांनी तरी कुणा-कुणावर लक्ष ठेवायचं. माझ्यावर शाईफेक झाली त्यावेळी माझ्यासोबत उपस्थित असणाऱ्या पोलिसाचं निलंबन वगैरे मी होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी हात जोडून विनंती करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र, गृहखात्याकडून अवघ्या काही तासांमध्ये ११ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.