
सिंधुदुर्ग : जगातील राजकीय तणाव, आखाती देशांमधील संघर्ष आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक अस्थिरता वाढली आहे. अशा काळात सुजाण भारतीय नागरिकांनी देशाच्या हितासाठी पुढील वर्षभर सोने खरेदी करू नये, पेट्रोल-डिझेल जपून वापरावे तसेच खासगी वाहनांचा वापर टाळून मेट्रो-इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करावा, असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. या सभेत बोलताना आखाती देशांमधील संघर्षाचा भारतावर झालेला परिणाम अधोरेखित करताना पुढील वर्षभर सोने खरेदी करू नका, पूर्वी देश संकटात असताना लोक सोनं दान करायचे. मात्र, आता दान न करता वर्षभर घरात कोणताही समारंभ असला तरीही खरेदी करू नका असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेलचं संकट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना आवाहन केलं आहे की, इंधनाचा आणि गॅसचा वापर जपून करा. तसेच कोविडच्या काळात ज्या पद्धतीने आपलं जीवन होतं अगदी त्याचपद्धतीने जगायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय करावे आणि काय करु नये हे सांगितलं आहे. रविवारी नागरीकांना आवाहन केलं आहे. पश्चिम आशियाई देशातील संकटामुळे पेट्रोल, गॅस, डिझेल सारख्या रोजच्या वापराच्या इंधनावर संकट आलेलं आहे. याचे कारण म्हणजे भारत मोठ्या प्रमाणावर इंधनाची आयात करतो. अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाचा सामना भारत करत असताना त्यांनी हे आवाहन केले आहे. या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी झाली आहे. यामुळे अत्यावश्यक इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा तेल वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा जागतिक मार्ग आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोविड-19 महामारीच्या काळात, आम्ही वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्स यांसारख्या अनेक प्रणाली विकसित केल्या आणि त्यांची आम्हाला सवय झाली. सध्याची परिस्थिती पाहता, या प्रणाली पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे. हे राष्ट्रीय हिताचे असेल आणि आपण त्यांना पुन्हा प्राधान्य दिले पाहिजे. सध्याच्या संकटात, आपण परकीय चलन वाचवण्यावरही विशेष भर दिला पाहिजे. कारण, जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेल खूप महाग झाले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवून त्याची बचत करणे ही आपली जबाबदारी आहे. जग अनेक मोठ्या आव्हानांना तोंड देत आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले, ज्यामुळे जागतिक समस्या अधिकच गंभीर झाल्या. अन्न, इंधन आणि खतांवर याचा गंभीर परिणाम झाला. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आमचे सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. युद्धामुळे जगभरात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांच्या किमती प्रचंड वाढल्या असून त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भारताकडे तेलाचे मोठे साठे नाहीत. आम्हाला इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल आणि गॅस आयात करावा लागतो असंही ते म्हणाले.
दरम्यान, भारतात सोने केवळ एक धातू नसून ती एक खरेदीची परंपरा बनली आहे. सर्वांत सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. देशात दरवर्षी शेकडो टन सोन्याची खरेदी केली जाते. लोक सण, उत्सव, लग्न आणि गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. भारत आपल्या सोन्याच्या गरजेपैकी बहुतांश गरज परदेशातून आयात करतो. यामुळेच, जेव्हा जेव्हा सोन्याची आयात वाढते तेव्हा मोठ्या प्रमाणात परकीय चलन देशाबाहेर जाते. तज्ज्ञांच्या मते, भारत दरवर्षी अब्जावधी डॉलर्स किंमतीच्या सोन्याची आयात करतो ज्यामुळे व्यापार तूटही वाढते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी एक वर्षासाठी सोने खरेदी केले नाही तर त्याचा परिणाम केवळ दागिन्यांच्या बाजारपेठेपुरता मर्यादित राहणार नाही. यामुळे देशाची अर्थव्यवस्था, रुपया, व्यापार तूट आणि गुंतवणुकीच्या पद्धतींमध्येही महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात.














