
नेपाळ : रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महापुरामुळे हजारोंहून अधिक लोक वाहून गेले तर घर पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
तिबेटमधून नेपाळमध्ये वाहणाऱ्या 'भोटेकोशी' नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या भागातील बाजारपेठा आणि अनेक जलविद्युत प्रकल्प पाण्याखाली गेले असून त्यांचे नुकसान झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाने त्रिशूळ नदीच्या प्रवाहाच्या दिशेने खालील भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिला आहे.
'द काठमांडू पोस्ट'ने रसुवाचे मुख्य जिल्हा अधिकारी नरेंद्र परियार यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या पुराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी नमूद केले की, "जिल्हा मुख्यालय किंवा आसपासच्या परिसरात कोणताही पाऊस झालेला नाही आणि हवामानही स्वच्छ आहे."
"नदीच्या वरच्या भागात एखादे हिमनदीचे सरोवर फुटल्यामुळे किंवा तात्पुरता बांध कोसळल्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. बाधित लोकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने म्हटले असून, प्राथमिक अहवालांनुसार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे".
पुराची दृश्ये निसर्गाचे रौद्र रूप दर्शवतात. अनेक घरे पाण्याखाली गेली असून अनेक घरांचे तळमजले जलमग्न झाले आहेत. नदीकाठच्या बाजारपेठा आणि अनेक जलविद्युत प्रकल्पही पाण्याखाली जाऊन त्यांचे नुकसान झाले आहे. त्रिशूळ नदीच्या परिसरातील भागात शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी नेपाळ लष्कराने दोन हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत.














