
नवी दिल्ली : महानदीचा छत्तीसगडमध्ये उगम झाला असून परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदीची पातळी वाढत आहे. त्यामुळे ओडीशातील महानदीवरील हिराकूड धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी 20 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये जगतसिंगपूर, खुर्दा, कटक, पुरी या जिल्हांना पुराचा फटका बसला असून सात लाखांहून अधिक लोक बाधित झाले. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ तसेच राज्याच्या आपत्कालीन यंत्रणांची 136 पथके कार्यरत आहे अशी माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली.
दक्षिण, मध्य गुजरातमध्ये शुक्रवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला. सखल भागांत पाणी साचल्याने पुरस्थिती निर्माण झाली असून सुरतमधील 1500 लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. एसडीआरएफची ३३, एनडीआरएफची १७ पथके बचाव कार्यासाठी विविध भागांत तैनात असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली.
काश्मीरलाही पावसाने तडाखा दिला आहे. येथील बडगाम, बारामुल्ला आणि बांदीपोरा भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तसेच रस्ते वाहतूक कोलमडली आहे. आसाममध्येही पावसामुळे 80 लोक मृत्यूमुखी झाल्याची माहिती समोर आली आहे.














