
जोयडा कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील हनुर तालुक्यातल्या हुग्याम वन क्षेत्रात ५ वाघांचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने देशभर खळबळ माजली आहे. या वाघांच्या मृत्यूच्या तपासात एक महत्त्वाची आणि तितकीच धक्कादायक बाबत समोर आलीय ती म्हणजे, शिकार केलेल्या गाईला खाल्यानंतर विषबाधा होऊन ४ पिल्लासह वाघिणीचा मृत्यू (4 cubs after being poisoned) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी ६ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार चामराजनगर जिल्ह्यातील हनुर तालुक्यातल्या हुग्याम वन क्षेत्रात पाच वाघ मृतावस्थेत बुधवारी सापडले होते. शुक्रवारी त्यांचे शवविच्छेदन तपासणी करण्यात आले. त्यात विषबाधा हे वाघांच्या मृत्यूचे कारण असल्याचे आढळून आले असून वन अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. वनमंत्री ईश्वर खड्रे यांच्या उपस्थितीत वाघांवर अंत्यविधी करण्यात आले.
गायीचे विष वाघांच्या अंगात भिनले
दरम्यान तपासावेळी वाघांनी शिकार केलेल्या गायीला अज्ञातांनी विष दिल्याचा संशय वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या गायीची शिकार केल्यावर हे विष (poison) वाघांच्याही अंगात भिनले आणि त्यांचा मृत्यू झाला असावा असा दाट संशय वन विभागाने व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हनूर तालुक्यातील ५ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण ६ संशयितांना ताब्यात घेतले आहे. मृत गायीच्या मालकाची अद्याप ओळख पटलेली नाही, परंतु सीडीआर आणि टॉवर लोकेशनच्या आधारे पोलिसांनी विष देणाऱ्या आणि मालकाचा शोध घेण्यासाठी सापळा रचला असल्याची माहिती हाती आली आहे.
तपासासाठी केंद्राचे विशेष पथक
या धक्कादायक प्रकरणानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) अलर्ट मोडवर असून त्यांनी वाघांच्या मृत्यू प्रकरणी तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे. बेंगळुरू प्रादेशिक कार्यालयाचे एआयजीव्ही हरीणी आणि डब्ल्यूसीसीबीच्या दक्षिण विभागाचे आरडीडी थेनमोली हे तपास पथकाचा भाग असून त्यांना २ आठवड्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. एनटीसीए डीआयडीएफ जी. भानुमती यांनी राज्य सरकारला तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती मिळाली आहे.