
नवी दिल्ली : तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यात महिलांच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्सची स्थापना, 200 युनिट मोफत वीज यासह अनेक निर्णयांचा समावेश आहे. दरम्यान, आता तामिळनाडूचे राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात म्हणजेच दुपारच्या जेवणात आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याचा विचार करीत आहे. याबाबतची संकल्पना राज्य शिक्षण मंत्री राजमोहन यांनी मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याकडे मांडली आहे.
'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, चिकन बिर्याणीची ही योजना राबवण्यासाठी तमिळनाडूच्या शालेय पोषण आहार योजनेत बदल केले जातील. या नवीन बदलांचा एक भाग म्हणून सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याच्या प्रस्तावावर विचार केला जात आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी अलीकडेच ही कल्पना मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासमोर मांडल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
प्रस्तावावर चर्चा करताना शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी तमिळनाडूचा राजकीय इतिहास आणि मुलांसाठीच्या मागील पोषण आहार कार्यक्रमांचा संदर्भ दिला. राजमोहन म्हणाले, "के. कामराज यांनी 'मध्यान्ह भोजन योजना' सुरू केली, कलैग्नार करुणानिधी यांनी त्यात अंड्यांचा समावेश केला, एमजीआर यांनी त्याचे रूपांतर 'पौष्टिक आहार कार्यक्रमात' केले आणि जयललिता यांनी आठवडाभर अंड्यांच वाटप सुरु ठेवले. त्याचप्रमाणे, आमच्या सरकारच्या काळात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एका दिवशी चिकन बिर्याणी दिली जावी, अशी आमची इच्छा आहे." सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री विजय या प्रस्तावाचा आढावा घेत आहेत आणि अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.














