BREAKING NEWS | काही तासात १० लाख कर्मचाऱ्यांच्या भरती मोहीमेचा होणार प्रारंभ !

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात ७५ हजार नव्या नेमणुका
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 21, 2022 21:11 PM
views 172  views

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २२ ऑक्टोबरला १० लाख कर्मचाऱ्यांच्या भरती मोहीमेचा आरंभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५ हजार नव्या नेमणुका केल्या जाणार आहेत. नवनियुक्त कर्मचाऱ्यांना त्वरित नियुक्तीपत्रे दिली जातील. भरती प्रक्रिया जलदगतीने होण्यासाठी, निवड प्रक्रिया सुलभ आणि तंत्रज्ञानयुक्त ठेवली जाणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून २२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता रोजगार मेला नोकरभरती मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. यावेळी पंतप्रधान नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देखील करतील.

पंतप्रधान मोदी यांच्या, युवकांना रोजगाराच्या संधी प्रदान करण्याच्या तसेच नागरिकांच्या कल्याणाप्रति असलेल्या कटिबद्धतेची पूर्तता करण्याच्या दृष्टीने, हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशांनुसार, सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये असलेल्या मंजुरीप्राप्त रिक्त जागा भरण्याचे काम मिशन मोडवर सुरू झाले आहे. देशभरातून निवडले गेलेले नवनियुक्त कर्मचारी, केंद्र सरकारच्या ३८ मंत्रालये/विभागांमध्ये कामावर रुजू होतील. यात अ श्रेणी, ब श्रेणी (राजपत्रित अधिकारी) तसेच ब श्रेणी (अ-राजपत्रित) आणि क श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या भरतीयोग्य पदांमध्ये, केंद्रीय सशस्त्र दलाचे कर्मचारी, उपनिरीक्षक, हवालदार, स्टेनो, स्वीय सचिव, प्राप्तिकर निरीक्षक, एमटीएस (शिपाई) अशा पदांचा समावेश आहे.

मंत्रालये आणि विभागांद्वारे, स्वतः ही भरतीप्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण केली जात आहे, अथवा, केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती मंडळ अशा संस्थांच्या माध्यमातून ही प्रक्रिया होत आहे. भरती प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी ती सुलभ आणि तंत्रज्ञानयुक्त करण्यात आली आहे.