
मुंबई : भिवंडी शहरातील बालाजी नगर गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत गुरुवार ३० जुलै रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कोसळली . या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इमारतीच्या ढिगार्याखाली दोन ते तीन जण अडकल्याची शक्यता आहे. पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना इमारत कोसळल्याची माहिती मिळत असून भिवंडी अग्निशमन दल तसेच पोलिसांकडून बचावकार्य सुरु आहे. या इमारतीचं नाव कोहिनूर असून 12 ते 14 वर्ष जुनी असल्याची माहिती आहे. या इमारतीला महापालिकेनं धोकादायकची नोटीस बजावली होती.
दरम्यान घटनेची माहिती मिळतात पालिका आपत्कालीन कक्ष अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून आले. परंतु इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता असल्या कारणाने बचाव सुरू करण्यात अडथळे येत होते. त्यानंतर रात्री एक वाजता घटनास्थळी एनडीआरएफचे पथक व टीडीआरएफ दाखल झाले. इमारतीच्या सुरुवातीला असलेली एक जुनी चाळ जेसीबीच्या सहाय्याने तोडून काढल्यानंतर दुर्घटग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचली. त्यानंतर बचाव कार्य करण्यासाठी सुरुवात केली आहे.














