
दोडामार्ग शेतकरी आणि फळबागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई यांचा खास लेख
दोडामार्ग तालुका २६ वर्षाचा झाला. गतवर्षी तालुक्यात रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करताना सर्वच स्थानिक वर्तमानपत्र शुभेच्छांनी भरून गेली होती. दोडामार्गमध्ये रस्त्यावर, चौकावर तालुका निर्मितीच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या शुभेच्छांचे बॅनर उभारले गेले होते. काही वृत्तपत्रांनी दोडामार्ग तालुक्याचा २५ वर्षाचा कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेतला. तसेच राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तालुक्याच्या प्रगतीबाबत शे-हजार कोटीची विकास कामे आणि नियोजन यावर आपली मते व्यक्त केली. साधारणतः माणसाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर वय वर्ष २५ म्हणजे वैचारिक परिपक्वता, स्वावलंबी, सक्षम कर्तव्यदक्ष आणि जबाबदारी पेलून वागण्याचे वय ! त्याच विचाराप्रमाणे तालुक्याला २६ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो किमान अपेक्षित विकासात्मक बदल व्हायला हवा होता आणि २६ वर्षाचा जो काळ विकासासाठी कमी नाहीच तो अपेक्षित विकास कुठे दिसण्यात किंवा ऐकिवात येत नाही.
२६ जून १९९९ रोजी सावंतवाडी तालुक्याचे विभाजन होऊन दोडामार्ग तालुका निर्मितीची घोषणा त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री, कोकणचे सुपूत्र स्वतंत्र दोडामार्ग तालुक्याचे शिल्पकार नारायण राणे यांनी ज्या दोडामार्गच्या सभेत केली त्या सभेस मी स्वतः उपस्थित होतो. नारायण राणे यांनी सांगितले होते, सावंतवाडी तालुका खूप मोठा आहे. गोवा, कर्नाटक सीमेवरील ग्रामस्थांना शासकीय, वैद्यकीय, न्यायालयीन आणि इतर सार्वजनिक गोष्टीसाठी ५०-६० किलोमिटरचा प्रवास करून संपूर्ण दिवस खर्ची घालून ये - जा करावी लागते. त्यात त्यांची दमछाक होते. सावंतवाडी तालुका मोठा व्यापक असल्यानं ग्रामस्थांची गेलेल्या वेळी त्वरित कार्यालयीन कामे होतीलच असे नाही. त्यासाठी सावंतवाडी तालुक्याचा भार कमी करण्यासाठी, अंतर्भूत ५७ गावांच्या विकासासाठी आणि मुख्य म्हणजे गोवा, कर्नाटक सीमेवर राहणाऱ्या ग्रामस्थांच्या सोयीसाठी, सर्व ग्रामस्थांचे प्रश्न त्वरित तडीस लागण्यासाठी दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होत आहे. लवकरच दोडामार्ग येथे प्रशस्त, सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा असणारे असे सिंधुदुर्गातील एकमेव सुंदर असे प्रशासकीय कार्यालय उभारले जाईल, ज्यात सर्व विभागांची कार्यालये असतील आणि जेणेकरून लांबून आलेल्या ग्रामस्थांची धावपळ होऊ नये, खूप छान वाटले आणि दोडामार्ग तालुकावासियांना उभारी आली.
दोडामार्ग तालुका बाळ जन्माला आले. सुदृढ व्हावे अशी सर्वांचीच अपेक्षा होती पण दुर्दैवाने आज वय वर्ष २६ नंतरही नाकर्ते राज्यकर्ते आणि उदासीन प्रशासन यामुळे अद्याप दोडामार्ग तालुका विकसनशील दृष्टीने कुपोषितच आहे. माफी असावी की मी इथे पक्षीय टीका करण्याचा हेतूने नाही तर माहितीसाठी म्हणून सांगतो की, १९९९ पासून आजमितीपर्यंत विविध राजकीय पक्षाचे जे आमदार, खासदार ६ निवडणुका जिंकून आले ते कोणी बाहेरचे आयाराम गयाराम नाही तर कोकणवासीयच होते. परंतु निवडणूक प्रचाराव्यतिरिक्त आमदार खासदारांचे विकासात्मक दृष्टीने तितकेसे असे लक्ष दोडामार्ग तालुक्यात केंद्रीत झाले नाही. दोडामार्ग तालुका हा हक्काची मतपेटीच म्हणून गणला जाऊन फक्त निवडणुकीच्याच कालावधीत लाल दिव्यांच्या गाड्या तालुक्यात फिरल्या. रस्ते, वीज, आरोग्य, पाणी, शिक्षण या पायाभूत सुविधांपासून दोडामार्ग तालुका वंचित राहिलाच असून विलोभनीय निसर्गसौंदर्य, नैसर्गिक जैवविविधता, दुर्मिळ वनाैषधीने परिपूर्ण असलेला भाग पर्यटन, नोकरी रोजगार आणि उद्योगधंदे यासाठी खूप मागे राहून तालुक्यातील तरुण रोजगारासाठी तालुक्याबाहेर गोवा, कर्नाटक, मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी विस्थापित झाला. तालुक्यात आडाळी येथे एमआयडीसी येऊन १७ वर्ष पूर्ण होऊनसुद्धा प्रत्यक्षात जागेवर रस्त्याखेरीज काहीही दिसत नाही. तालुक्यात पूरक उद्योगधंदे, व्यापारी संकुले नसल्याने येथील तरुणांना उदरनिर्वाहासाठी तालुक्याबाहेर कामासाठी जावे लागते. अनेक अपघात झाल्यानंतर अलीकडच्या २-३ वर्षात दोडामार्ग-बांदा, दोडामार्ग-तिराळी रस्ता सुरक्षित, आरामदायी वाहतूक करण्यालायक झाला. अखंड वीजपुरवठा दोडामार्ग तालुक्याच्या नशिबी नाहीच. तालुक्याला अतिरिक्त वीज पुरवठा करणाऱ्या महालक्ष्मी कंपनीशी केलेला करार संपुष्टात येऊन ३ वर्षे झाली तरीसुद्धा त्याविषयी काहीही हालचाल होताना दिसत नाही आहे. दिवसातून ३०-४० वेळा, कधीकधी २-३ दिवस वीज पुरवठा खंडित होणे हे दोडामार्ग तालुकावासियांच्या पाचवीलाच पूजलेले आहे. गोव्यात सिंधुदुर्गासारखाच पाऊस पडतो परंतु तिथे १ मिनिटांसाठीही वीज पुरवठा खंडित होत नाही की रस्ते वाहून जात नाहीत. जेव्हा महावितरणला वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण किंवा ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते वाहून जाण्याविषयी संबधित अधिकारी, ठेकेदाराला जाब विचारले जातात तेव्हा जास्त पाऊस पडण्याचे ठरलेलं कारण देतात. अशा कोणालाही न पटणाऱ्या सबबी ऐकल्यावर वाटते की, बहुतेक सिंधुदुर्ग आणि गोवा कर्नाटक सीमेवर पडणारा पाऊस हा सीमेवर पडताना सिंधुदुर्गात वेगळी क्वालिटी आणि गोवा कर्नाटकात वेगळी क्वालिटी जपतो असे वाटते.
तिलारी धरणाच्या लगतच्या गावांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. सन २०२४ च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यावेळच्या विद्यमान पालकमंत्र्यांनी तिलारी धरण संबधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात जागेवर बोलावून अगदी ५-१० मिनिटांच्या अवधीत धरण, नद्यांचे पाणी कुठून, कसे, कोणत्या ठिकाणी, पुरवठा करायचे याविषयी सूचना दिल्या. त्याचा स्थानिक वृत्तपत्रात गवगवा झाला होता. त्यानंतर सूचना कृतीत येण्यासंबंधी काहीही ऐकिवात नाही. सध्या जे पारंपरिक नैसर्गिक पाणी स्रोत जिवंत असून मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, त्याचा भविष्यातील १० वर्षांनंतरचा तुटवडा अभ्यासून आज पाणीसाठा, पाणी सिंचन संबधित योजना उभारतानाच्या हालचाली तालुक्यात कुठेही होताना दिसत नाहीत. आरोग्य यंत्रणेविषयी न बोललेलेच बरे. मुळात दोडामार्ग येथे असलेले ग्रामीण रुग्णालय याची बाहेरून भयावह अवस्था पाहिली तर रुग्णांस तेथे जाऊन निश्चित इलाज मिळतील की नाही याबद्दल साशंकता वाटते. बाह्यदर्शिनी किंवा आतून रुग्णालयात हवी तशी स्वच्छता, सेवासुविधा नसून गंभीर आजार, अपघातांसाठी तातडीच्या वैद्यकीय उपचारांची वानवा आहे. अलीकडेच एका आप्तस्वकीयाचा मृतदेह शवागृहात नेत असताना रुग्णालयाच्या आवारातील रस्ता इतका दयनीय होता की स्ट्रेचरवरून तो मृतदेह खाली पडेल काय याची भीती वाटत होती. प्रत्यक्षात शवागृहात शीतपेटीत मृतदेह ठेवताना ते शवागृह कमी गोडाऊनच जास्त वाटत होते. सर्दी, ताप, खोकला सारखे तत्सम आजार सोडले तर गंभीर आजारावर किंवा अपघात झालेल्या रुग्णास पुढील उपचारासाठी गोव्यातील बांबोळी रुग्णालयात पाठवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लेटर पॅड सदैव तयारच असते.
जेव्हा महाराष्ट्रातील रुग्ण बांबोळीला घेऊन जातो, तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांचा "भायलो" म्हणून डोक्याला आठ्या घालणारा कटाक्ष मान लाज शरमेनी खाली घालायला लावतो. दोडामार्गात वाहतुकीची कोंडी होणे हे कायमचेच आहे. त्यात करून आठवडा बाजाराचे नियोजन शून्य असल्याने तसेच हक्काची जागा नसल्याने रविवार दिवशी वाहने सोडाच पण पादचाऱ्यांना चालणे मुश्किल होते. रस्त्यावर मोकाट जनावरे ही नित्याचीच बाब. तालुक्यातील बऱ्याच गावात मोडकळीस आलेल्या आणि गळक्या छतांच्या शाळा आजही तालुक्यात आहेत. तालुक्याच्या एका बाजूने घनदाट रानडोंगराचा प्रदेश असल्याने रानटी जनावरांचा त्रास सातत्याने होत आहे. गवारेड्यांच्या धडकेने अनेकजण जखमी झाले. अलीकडेच हत्तीच्या हल्ल्यात एका ग्रामस्थांस जीव गमवावा लागला. समयसूचकता पाहून राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हत्ती पकड मोहीम लवकरात लवकर राबवून दोडामार्ग तालुका हत्ती भयमुक्त करू, हे आश्वासन फक्त प्रसारमाध्यमातून प्रसार करण्यापुरते होते. प्रत्यक्षात काहीही झाले नाही. आता तर दोडामार्ग तालुक्यामधील शेतकरी हे स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नाहीतर रानटी प्राण्यांच्या उदरनिर्वाहासाठी शेती बागायती करतात हे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मार्च २०२५ महिन्यात एका राजकीय पक्ष प्रतिनिधी, प्रवक्त्याकडे शेतकऱ्यांच्या निकडीचे प्रश्नांसोबत हत्ती उपद्रव प्रश्न मांडला असताना हत्ती हे घाटावर ऊस असताना तिथे आणि तेथील ऊस संपला की कोकणात केळी खाण्यासाठी येतात त्यावर काय उपाय करणार? अशी हास्यास्पद उत्तरे देऊन रानटी प्राणी उपद्रव प्रश्नांस बगल दिली. पर्यटनासाठी दोडामार्ग तालुक्यातील मांगेली धबधबा, तेरवण मेढे जलाशय, पुरातन नागनाथ मंदिर आणि या सारखी अनेक स्थळांची योग्य निगा राखली, सुशोभीकरण केले तर गोव्याचे पर्यटक दोडामार्गात वळून पर्यटनास गती मिळू शकते. तिलारी धरणांच्या उंचावर असलेले गार्डन हे उघड्या बोडक्या अवस्थेत असून इतरत्र प्लास्टीकच्या, दारूच्या बाटल्या पडलेल्या पाहून तेथील सुरक्षेबाबत प्रशचिन्ह उभे राहते. या तालुका निर्मितीच्या २६ वर्षांनंतरही पंचायत समितीचे कार्यालय अपुऱ्या दाटीवाटीच्या जागेत आहे. अलीकडेच पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकारी सर्व ग्रामपंचायत सरपंचांची अंधाऱ्या जागेत मोबाईलची टॉर्च चालू करून त्या उजेडात बैठक चालवताना पाहून हसावे की रडावे हा विचार पडला. याहीपेक्षा कहर की काय तर तालुका मुख्यालयाची दयनीय अवस्था आहे. जर मुळात तालुका मुख्यालयात मूलभूत सोयीसुविधांची वानवा असेल तर तालुक्यात तरी कुठे सोयी सुविधा मिळतील, असा प्रश्न उभा राहतो. प्रशस्त जागेत कार्यालयाची इमारत आहे. प्रवेशद्वारच खड्डेमय आहे. पावसाळ्यात कार्यालयाच्या प्रांगणात ठिकठिकाणी पाणी साचते आणि मोकाट गुरांचे, भटक्या कुत्र्यांचे तालुका मुख्यालय हे आश्रयस्थान असल्याने ठिकठिकाणी गुरांचे शेण आणि कुत्र्याच्या विष्ठा चुकवीत उड्या मारताच मुख्यालयात प्रवेश करावा लागतो. इमारतीच्या बाजूला लागूनच जुन्या जप्त केलेल्या गाड्यांचा खच पडला असून तालुका मुख्यालय कमी जंकयार्डच वाटते. कार्यालय इमारतीच्या बाजूला वर्षाचे १२ महिने रानटी गवत आणि इतर वनस्पती वाढलेल्या आहेत. बाहेरून आणि आतून रंगरंगोटी, त्यातच प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, कागद, बॉक्स आणि इतर कचऱ्याचा ठिकठिकाणी खच पडलेला पाहून त्रयस्थ नक्की प्रशासकीय इमारत की कचरापट्टी भंगारखाना आहे याच्या विवंचनेत पडेल. तसेच इमारती बाजूला आणि मागे मूत्रविसर्जनाची दुर्गंधी पसरली आहे. सेतू कार्यालय कायम अंधारात आणि कुर्मगतीने चालते. सेतू कार्यालयाच्या समोर अभ्यंगतकक्षाला कायमचे कुलूप असून बाजूला जिन्याजवळ अपुऱ्या अडचणीच्या असुरक्षित जागी ७-८ ग्रामस्थ बसतात. तिथे इमारतीचे इलेक्ट्रिक सप्लाय पॅनल उघडेच आहे. जर तिथे शॉर्ट सर्किटमुळे काही झाले ती तिथे बसणाऱ्या ग्रामस्थांना धोका आहे. पाण्याच्या कुलरकडे पाहून पाणी पिण्याची इच्छा होणार नाही. उपकोषागार, दुय्यम निबंधक, पोलीस कार्यालय या विभागाच्या इमारतीमधील अतिस्वच्छ दालनाचा भाग सोडला तर बाकी कृषी, महसूल, अन्नपुरवठा, भूमी अभिलेख, तहसील विभागात कर्मचारी कमी आणि फाईलच जास्त दिसतात. इमारतीमध्ये ५-६ स्वच्छता, प्रसाधनगृह आहेत त्यापैकी फक्त २ अस्वच्छ, घाणेरडी, दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे तेथे येणाऱ्या सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी तर उर्वरित स्वछ स्वच्छतागृह तेथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या कडी कुलुपात. अस्वच्छ, दुर्गंधी, अंधार असलेल्या स्वच्छता गृहात जाण्यापेक्षा येणारे ग्रामस्थ नाईलाजास्तव इमारतीच्या बाजूला किंवा मागे झुडुपाआड लघुशंका करतात त्यामुळे बेफाट दुर्गंधी पसरलेली असते. महिलावर्गाची फारच गैरसोय होते.
अलीकडे सातत्याने तालुका इमारतीमधील अस्वच्छतेचा मुद्दा सातत्याने स्थानिकांनी उचलून धरल्याने मागील २-३ महिन्यांत स्वच्छतागृहाची साफसफाई केलेली दिसते. तालुका मुख्यालयात बहुतांशी वेळी इंटरनेटचा खोळंबा असतो तर कधी सर्व्हर डाऊन असतो. सोमवारी तर हक्काची वीज गायब असते, त्यामुळे कार्यालयात कर्मचाऱ्यांची तोंडे पाहण्याशिवाय काहीच होण्यासारखे नसते. वास्तविक आता सगळीकडे संगणकीकरण झाल्याने कोणत्याही प्रशासकीय इमारतीस अखंड वीजपुरवठा किंवा जनरेटर पॉवर बरोबरच उत्तम प्रतीचे इंटरनेट नेटवर्क असणे अनिवार्य आहे. परंतु इथे ते काहीच नाही. त्यामुळे सोमवारी येणाऱ्या गरजूंना रिकामी हाताने परतावे लागते. तालुक्यातील बरेचसे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडे अतिरिक्त गावाचा कार्यभार सोपावलेला असल्याने ग्रामपंचायत, महसूल, कृषी विभागाची कामे कूर्मगतीने चालतात. एकूण दोडामार्ग तालुका हे एक प्रकारचे ट्रेनिंग सेंटर आहे असे म्हणावयास काहीच हरकत नाही कारण बरेचसे नव्याने प्रशासकीय सेवेत रुजू झालेले कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, वीज पुरवठा प्रश्न जिथे गंभीर आहे तिथे हंगामी नवशीखे विद्युत अभियंता असल्याने जरी ते कार्यतत्पर असले तरी दिरंगाईने निर्णय घेतले जातात. मे महिन्याच्या शेवटाला एका राजकीय नेत्याने ४ महिने सातत्याने अनुपस्थित असलेल्या तहसीलदार साहेबांना शोधून दाखवून ५१ हजाराचे बक्षीस घेऊन जा, असे जाहीरपणे वृत्तपत्रात प्रसिद्धीस आणलेली गोष्ट प्रशासनास किती लाजिरवाणी, लांच्छनास्पद आहे याचा विचार करु शकता. भूमी अभिलेख कार्यालयात एखाद्या खेडुतास त्याच्या मालकीच्या जमिनीचा नकाशा हवा असल्यास विहित प्रकारचा मागणी अर्ज जो भरून दिला जातो त्यात सदर नकाशा अर्ज केल्यानंतर ठराविक कालावधीत मिळेल, असे नमूद केलेले असते पण तो त्या कालावधीत सोडाच पण दुप्पट कालावधीत मिळणे दुपरास्त असते. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीसुद्धा काहीवेळा तेथील कर्मचारीवर्ग हजर असताना पाहून सुट्टीच्या दिवशीची उपस्थिती आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना नकाशे मिळवताना लागणारा उशीर या विषयी प्रश्न उपस्थित होतात. सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि वनविभागाचे कार्यालयात फक्त लिपीकच दिसतात. नियुक्तिक अधिकारी प्रत्यक्षात भेटण्याचा योग दुर्मिळच..
असा हा कारभार असलेला रेंगाळत, सरपटत, मरगळलेल्या स्थितीत चाललेला नव्हे रेटत असलेला तालुका.
स्थानिक पक्षीय कार्यकर्ते फक्त त्या त्या पक्षाचे प्रमुख नेते आले की त्यांच्या आजूबाजूला कोंडी करताना दिसण्याखेरीज इतरवेळी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी, सोयी सुविधांसाठी शेतकरी, कष्टकरी यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या अडीअडचणीस धावताना दिसत नाहीत. वास्तविक गोवा, कर्नाटक या प्रगत राज्याच्या वेशीवर असलेला तालुका. ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला या उक्तीप्रमाणे त्या राज्याच्या विकासाबरोबर नाही तर काहीअंशी तरी विकास होणे अपरिहार्य अपेक्षित आहे परंतु दोडामार्गविषयी राजकीय, प्रशासन अनास्थेमुळे जरी पिछाडीवर असला तरी राज्यकर्त्यांनी विकासाच्या आघाडीचे कोटीचे आकडे वाचून दाखवले तरी सामान्यांचे जीवनमान हलाखीचे असून राजकीय प्रशासकीय गुंत्यात सार्वजनिक सोयी सुविधा योजनांपासून वंचित आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात प्रसिद्धी माध्यमांना काहींनी मुलाखत दिली. त्यात सातत्याने दोडामार्ग तालुक्याच्या शेजारी गोवा राज्यातील पर्यटन स्थळे, थिवी रेल्वे स्टेशन, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ याचा फायदा तालुक्याला होईल याचे गुणगान गायिले. परंतु गोवा राज्याच्या अंगाखाली अंग धुण्यापेक्षा आपण त्यांच्या तुलनेत कसे आत्मनिर्भर होऊ याची विश्वासहर्ता दिली नाही. तालुक्यातील आठवडा बाजारपेठ बेळगाव,पश्चिम महाराष्ट्रातील भाजी आणि इतर तत्सम किरकोळ गोष्टी विकणाऱ्या विक्रेत्यानी भरलेले असते पण स्थानिक भूमिपुत्रांना भाजीपाला उत्पादन करण्यासाठी रानटी प्राण्यांपासून अभय, शेतीसाठी पाणीपुरवठा, वीजपुरवठा, उत्कृष्ट संकरित शेत बियाणे, रास्त भावात खते, शेतकरी उत्पादित शेतमालाला थेट बाजारपेठ या मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हळूहळू शेतीपासून नाविलाजास्तव परावृत्त होत आहे. शेजारच्या राज्यात अखंडित वीज पुरवठा, उत्कृष्ट चांगल्या प्रतीचे रस्ते आणि मुबलक पाणीपुरवठा आहेत. आमच्या तालुक्यातील मूलभूत सोयीची दयनीय अवस्था पाहून संवेदनशील तालुकावासीय शरमेने मान खाली घालुन निश्चितच प्रश्न विचारतील की तालुका निर्मितीचे फलित काय? इप्सित साध्य झाले आणि तालुक्याचा कोणता मोठा वाखाणण्याजोगा विकास झाला? राज्यकर्ते, प्रशासनकर्ते हो, २६ वर्षे वयाच्या किमान विकास अपेक्षित असणाऱ्या दोडामार्ग तालुक्याला कुठे नेवून ठेवलात?