LIVE UPDATES

‘ओले काजू’ बदलणार सिंधुदुर्गचे अर्थकारण !

दापोली कृषी विद्यापिठाची ‘वेंगुर्ला-१० एमबी’ वाण उपलब्‍ध
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 19, 2025 20:51 PM
views 368  views

सिंधुदुर्ग : दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांची गरज ओळखून १५ वर्षांच्या संशोधनातून खास ओल्या काजूगरासाठी ‘वेंगुर्ला-१० एमबी’ हे वाण लागवडीसाठी उपलब्ध करून दिले आहे. विद्यापीठाच्या काजू संशोधनातील हे सर्वात ‘युनिक’ वाण असून वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात रोपे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. मागणीनुसार शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून दिली जातील, असे कोकण कृषी विद्यापीठाने सांगितले आहे. जिल्‍ह्यात सुमारे ७२ हजार हेक्‍टर क्षेत्र हे काजूचे आहे, विशेष म्‍हणजे देशात काजू उत्‍पादनात जिल्‍हा अग्रेसर आहे. त्‍यामुळे काजू उत्‍पादन सिंधुदुर्गच्‍या अर्थकारणाला वेगळी  दिशा देणार आहे.  

गर काढणे होणार सोपे...

या काजूच्या टरफलामध्ये तेल कमी, टरफलाची जाडी मध्यम व काजूगर काढण्यास सुलभ आहे, असे या वाणाचे खास वैशिष्ट्य आहे. अन्य जार्तीच्या काजूच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात चिक असतो व त्या बीची साल जाड असल्यामुळे वियांमधून काजूगर काढणे फार अवघड होते. बऱ्याचदा गर काढताना जाड सालीमुळे अखंड गर न मिळता गराचा तुकडा होतो. तसेच बियांमध्ये असलेल्या अधिक चिकामुळे हाताला इजा होते, हात खराब होतात. त्यामुळे ‘वेंगुर्ला-१० एमबी’ हे विकसित केलेले नवीन वाण भविष्यात शेतकऱ्यांच्या पसंतीस मोठ्या प्रमाणात उतरेल, असे दिसत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे हे वाण विकसित केले आहे.

प्रक्रिया उद्योगातून सिंधुदुर्गला मोठी संधी 

‘वेंगुर्ला काजू’ला २०१८ मध्ये जीआय मानांकन मिळाले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ७२ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये काजू लागवड झालेली आहे. देशामध्ये काजू प्रक्रियेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ७२ हजार हेक्टर हे काजू लागवडीचे क्षेत्र आहे. प्रत्यक्षात यामधून ५९ हजार हेक्टर क्षेत्रातून फळे निघतात १.६० मेट्रीक टन हेक्टरी काजूचे उत्पादन आहे. म्हणजेच ९५ हजार मे.टन काजू उत्पादन सध्या मिळत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत ९७ मोठे तर, २२४ छोटे काजू प्रक्रिया उद्योग अस्तित्वात आहेत. यामधून १० हजार ५८४ मे.टन प्रक्रिया केलेले काजू उत्पादन मिळते. याचबरोबर मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेमध्ये १०मोठ्या काजू प्रक्रिया उत्पादकांना मान्यता आहे. त्यामधून २० हजार मे. टन प्रक्रिया काजू उत्पादन मिळत आहे.

काजूस पोषक वातावरण 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू लागवडीला मात्र पोषक वातावरण आहे. त्यामुळे मागील २० ते २५ वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजूची लागवड झाली. अलीकडील काही वर्षांत तर दरवर्षी पाच हजार हेक्टर याप्रमाणात लागवड झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सुमारे ७२ हजार हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून, पैकी ६२ ते ६५ हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे.

कोकणात लाखोंची उलाढाल 

काजूच्या हंगामात ओल्या काजूगराला मोठ्याप्रमाणात मागणी असते. मोठमोठ्या शहरांतील हॉटेल्समध्ये भाजी, मटण, चिकनमध्ये ओल्या काजूगरांचा वापर केला जातो. ओले काजूगर सुक्या भाजीसाठी आणि पुलाब व बिर्याणीमध्येही वापरले जातात. वेगवेगळ्या भाज्यांत ओले काजूगर वापरल्याने जेवणाची लज्जत फारच वाढते. त्यामुळे या ओल्या काजूगराला बाजारात खूप मागणी आहे. ओले काजूगर हंगामामध्ये १ हजार ते बाराशे रुपये किलो दराने विकले जातात. या ओल्या काजू गरातून कोकणात रोजची लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे विद्यापीठाने विकसित केलेली नवीन जात शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात उत्पन्न देईल, असे सांगितले जात आहे.

राज्यात १ लाख ९१ हजार हेक्टरवर काजू लागवड

१९५७ साली काजू पिकाचे संशोधन झाले, तर विद्यापीठाने देशातील पहिली जात निवड पद्धतीने विकसित केली. कोकण कृषी विद्यापीठाने सुमारे तीनशेहून अधिक काजूची वाणे गोळा केली आहेत. त्यातून वेंगुर्ला १ ते ९ या नवीन जाती विकसित केल्या, तर २०२४ साली वेंगुर्ला- १० एमबी ही नवीन जात विकसित केली, १९९० साली काजूचे ४० हजार हेक्टर क्षेत्र होते. त्याला रोजगार हमी योजना आणि विकसित केलेल्या काजूच्या जातींची जोड दिल्याने हे क्षेत्र राज्यात १ लाख ९१ हजार हेक्टर झाले आहे.

ओल्या काजूगरांचे वाढले महत्त्व

प्रक्रियायुक्त काजू ही जशी कोकणची खासियत आहे. त्याचबरोबर ओल्या काजूगरांचेही महत्त्व दुर्लक्षून चालणार नाही. कोकणात हंगामात घरोघरी ओल्या काजुगराची भाजी बनविली जाते. ती अत्यंत चविष्ट असते. काही वर्षांपासून काजू बीच्या दरात होणाऱ्या चढउतारामुळे ओल्या काजूगरांचे महत्त्व वाढले आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पंधरा वर्षापासून ओले काजूगर आणि ओल्या बिया यांच्या विक्रीला सुरुवात झाली. कुणकवण (ता. देवगड), खारेपाटण (ता. कणकवली), एडगाव (ता. वैभववाडी), शिरगाव (ता. देवगड), सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ यांसह विविध गावांतील शेतकरी या विक्री व्यवसायात असल्याचे पाहावयास मिळते.

दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक केंद्र वेंगुर्ले येथे या वाणाची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मागणी केल्यानंतर रोपे उपलब्ध करून दिली जातील तर या नवीन वाणाविषयी अधिक माहिती विद्यापीठाच्या माहिती संशोधन केंद्रात उपलब्ध आहेत. 

- डॉ. आर. सी. गजभिये, सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली