
कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या सर्वच विभागांनी चांगले कार्य केले त्यामुळेच आम्ही जनतेची वचनपूर्ती करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे जनतेची वचनपूर्ती करण्यासाठीच असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत कणकवली तहसील कार्यालयाच्या पटांगणावर विविध योजनांमधील दाखले वितरणाचा व समस्यांबाबत निवेदन स्वीकारण्याचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकरष जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आदी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. सत्ता आल्यानंतर आम्ही वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली त्याची पहिली वचनपूर्ती म्हणजे राज्यातील 33 लाख शेतकऱ्यांना मिळून 36 हजार कोटींची कर्जमाफी दिली. 45 लाख शेतकऱ्यांचे 48 हजार कोटी वीज पंप बिल माफ केले. महिला शेतकरी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्या माध्यमातून केवळ महिला शेतकरीच नव्हे तर शेतमजूर महिलेला देखील महिला शेतकऱ्याचा दर्जा दिला. गतिमान पारदर्शक कारभार हे शिवाजी महाराजांचे तत्व तसेच बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून गोरगरिबांना दिलेले हक्क मिळावेत, हीच आमच्या सरकारची भूमिका आहे, असे बावनकुळे म्हणाले.











